प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागातील 3 कोटी 14 लाख 61 हजार 38 रूपयांच्या आर्थिक घोटाळयाप्रकरणातील संशयित तत्कालिन कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यासह चौघा जणांचा अटकपूर्व जामिन सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी. एस. विठलानी यंनी फेटाळून लावला. अटकपूर्व जामिनासाठी कारंडे यांच्यासह अधीक्षक नितीन नंदवाळकर, अनिरूध्द शेटे आणि कनिष्ठ लिपिक विजय खातू यांनी अर्ज केले होते. आता या चौघांपुढे उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज करणे किंवा पोलिसांत हजर होणे हे दोनच पर्याय आहेत.
घरफाळा घोटाळा प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात 13 जून रोजी महापालिकेच्या वतीने कारंडे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. विद्यमान कर निर्धारक आणि संग्राहक संजय भोसले यांनी गुन्हा नोंद करून कागदपत्रे सादर केली होती. गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी दिवाकर कारंडे, नितीन नंदवाळकर, अनिरूध्द शेटे आणि विजय खातू यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी. एस. विठलानी यांच्या न्यायालयापुढे सुनावणी झाली. सुनावणीत सरकारी वकील ऍड. विवेक शुक्ल यांनी युक्तीवाद केला. घरफाळा घोटाळा प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने म्हणणे मांडण्यासाठी या सुनावणी प्रक्रियेत महापालिकेचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी प्रतिवादी म्हणून अर्ज केला होता. न्यायालयाने तो मान्यही केला होता.
सुनावणी दरम्यान, प्रा. जयंत पाटील यांच्यावतीने ऍड. प्रवीण उर्फ बाबा इंदुलकर यांनी युक्तीवाद केला. आर्थिक घोटाळय़ा संदर्भात ईडीने (सक्त वसुली संचलनालय) गुन्हा दाखल केल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली होती. त्यामध्ये अर्थिक घोटाळा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीकडून झालेला खून रागाच्या भरात झालेला गुन्हा असतो. मात्र आर्थिक घोटाळे पूर्व नियोजित, व्यूहरचना करून केले जातात. त्यामुळे समाजाचे, देशाचे नुकसान होते. अशा गुन्हय़ात आरोपींना अटकपूर्व जामिन मिळाला तर पोलीस चौकशीत व्यत्यय येण्याची शक्यता असते. म्हणून कस्टोडियन इंट्रॉगेशन अर्थात पोलीस कोठडीतील चौकशी करणे गरजेचे असते, अशी निरीक्षणे नोंदवली आहेत. या निरीक्षणाचे दाखल ऍड. इंदुलकर यांनी न्यायालयापुढे मांडले. त्यानंतर न्यायमूर्ती विठलानी यांनी चारही जणांचे अटकपूर्व जामिन फेटाळून लावले.
चौघांजणांविरोधात 13 जून रोजी गुन्हा नोंद
1 एप्रिल 2014 ते 12 फेब्रुवारी 2020 या कालावधीत दिवाकर बापुसो कारंडे, नितीन नंदवाळकर, अनिरूध्द शेटे आणि विजय खातू या चौघांनी संगनमतानं मिळकतधारकांच्या घरफाळा कागदपत्रात फेरबदल केले. यातून बडया मिळकतधारकांना नियमबाहय घरफाळा सवलत देणं, भाडेकरारानुसार घरफाळा न आकारणं, यासह अन्य प्रकारे, महापालिकेचे 3 कोटी 14 लाख 61 हजार 38 रूपयांचं नुकसान केल्याबद्दल, या चौघांच्या विरोधात 13 जून रोजी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद झाला.