श्रीकांत जाधव/तुरंबे
काळमावाडी येथील दूधगंगा जलाशयात 24 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 96.80 टक्के भरले आहे. अशा काळात धरणाची सुरक्षा रामभरोशे झाली आहे. धरणाच्या चौकीत फक्त दिवसा १ आणि रात्री १ पाठबंधारे विभागाचे कर्मचारी रक्षक म्हणून काम करत आहेत. दूधगंगा नगर शाखेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र शासनाने त्या भरल्या नसल्याने कर्मचाऱ्यांच्यावरही कामाचा ताण पडत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा अंतराज्य प्रकल्प म्हणून काळमावाडी येथील दूधगंगा धरणाची ओळख आहे. धरण बांधणी पासून धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे मुख्य भिंतीची गळती कोठ्यावधी रुपये खर्चूनही कमी झाली नाहीत. धरणाला एकूण नऊ मोनोलीत आहेत. यामध्ये धरण गळती काडण्यासाठी आजपर्यंत सिमेंट ग्रावंटिंग बरोबर विविध उपाययोजना राबवल्या मात्र त्याला फारसे यश आलेले नाही. याचबरोबर कालवेफुटी आणि कालव्यातील कामे दर्जाहीन झाली आहेत. सध्या धरण 95.80 टक्के भरले आहे. अशा अवस्थेत धरणाची सुरक्षा महत्वाची आहे. मात्र कोरोना काळात धरणावर सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी बंद केले आहेत.
यामुळे धरणावर पाटबंधारे विभागाने नेमलेले फक्त दोनच कर्मचारी धरणाचे रक्षण करत आहेत. यामध्ये दिवसा एक आणि रात्री एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. काळमावाडी धरण हे लोकवस्तीपासून लांब आहे. तर शेजारी अभयारण्य आहे. अशा परस्थितीत फक्त एकच कर्मचारी धरणाची सुरक्षा कशी करणार हा प्रश्न उभारत आहे.
सध्या दूधगंगा नगर शाखेला फक्त १८ कर्मचारी आहेत. मागील काळात येथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची रिक्त झालेली पदे भरलीच नाहीत यामुळे अनेक पदे रिक्तच आहेत. तर येथील अधिकारीही प्रत्यक्ष धरण स्थळावर महापूर काळात तरी असणे गरजेचे आहे. काही मोजकेच कर्मचारी धरणावर काम करतात सध्या धरणातील पाणीसाठा वाढत आहे. अश्या काळात मुसळधार पाउस पडला तर धरणात येणारे पाणी आणि धरणातून जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग करणे याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी पाउस वाढला तर धरणाच्या सुरक्षेसाठी पाणी विसर्गाचे तात्काळ नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी महापूर काळात २४ तास सक्षम अधिकारी असणे महत्वाचे आहे. पाठबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि शासनाने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.