प्रतिनिधी / सरवडे
कोल्हापूर जिल्हासह सीमाभागातील लोकांची व शेतीची तहान भागविणारे राधानगरी तालुक्यातील दुधगंगा नदिवरील काळम्मावाडी येथील राजर्षी शाहू जलाशय पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरला असून आता सांडव्यावरुन विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे या धरणावर पाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेले दोन दिवस धरणक्षेत्रात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता ७१९.१२० दक्षलक्ष घनमीटर म्हणजे २५.४० टीएमसी आहे. गतवर्षीपेक्षा हे धरण ऑगस्टमध्ये भरले होते यावर्षी एक महिना उशिरा भरले आहे. धरण भरल्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांची पाण्याची चिंता मिटली आहे.