प्रतिनिधी / कोल्हापूर
सोमवारी सकाळी आईने आवाज देताच दप्तर, पेनची जुळवाजुळव करीत गणवेश परिधान करून विद्यार्थी तयार झाले. तेवढ्यात रिक्षावाले मामाच्या रिक्षाचा हॉर्न कानी पडला आणि विद्यार्थ्यांनी रिक्षात बसून शाळेच्या आवारात प्रवेश केला. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांचा एकच किलबिलाट सुरू झाला. थर्मल स्कॅनिंग करून, सॅनिटायझर आणि मास्क आदी वस्तूंचे वेलकम किट देऊन वर्गात सोडण्यात आले. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवून अध्यापन करण्यात आले. तब्बल दीड वर्षांनी शाळेत प्रत्यक्ष शिक्षण घेण्याबरोबर मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर दिसत होता.
कोरोनाचा संसर्ग संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सगळयात पहिल्यांदा शाळा बंद केल्या होत्या. गतवर्षी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. परंतू कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. यात विद्यार्थ्यांची गळती झाली असती तर शिक्षकही अतिरिक्त होण्याची भिती होती. त्यामुळे शिक्षक, पालक यांच्याकडून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 80 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली.
त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शहरातील महापालिका क्षेत्रातील आठवी ते बारावी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. काही शाळंनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा सुरू झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हाधिकारी, जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्हाधिकारी राहुल रेखावार, गटशिक्षणाधिकारी जयंत उगले यांनी करवीर तालुक्यातील यादववाडीतील विद्यामंदिर शाळेला भेट दिली. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गटशिक्षणाधिकारी शंकर यादव यांनी वडणगे येथल केंद्र शाळा, केरले येथील कुमार विद्यामंदिर आणि कन्या विद्यामंदिरला भेट दिली. या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर व शाळा सुरू करण्याबाबतच्या शासन परिपत्रकाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले.