कृषी कायदे व प्रस्तावित वीज विधेयक रद्द करण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कृषी कायद्यांसह प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, केंद्र सरकारकडून 6 हजार कोटींचे अर्थसहाय्य घेऊन लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करावे आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने 26 मार्च रोजी `भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. कोल्हापूर जिह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेने आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून याममध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उदय नारकर यांनी पत्रकार बैठकीद्वारे केले.
नारकर म्हणाले, गेल्या वर्षभरात राज्यातील ग्राहकांवर वीज बिलाचा बोजा पडला आहे. घरगुती वीज ग्राहक अर्थिक विवंचनेमुळे मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे राज्यसरकारने केंद्रसरकारकडून अर्थसहाय्य मिळवून वीज बिल माफ करावे. केंद्र सरकार देशभरात वीज निर्मिती आणि वीज पुरवठा कंपन्यांचे खासगीकरण करत आहे. लॉकडाऊन काळात मोदी सरकारने जनतेच्या मदतीसाठी 20 लाख कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
त्या मदतीतून वीज ग्राहकांना सवलत देणे शक्य आहे. त्यामधून पहिल्या टप्प्यात एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ होणे आवश्यक आहे. पत्रकार बैठकीस सुभाष जाधव, आप्पा परीट, अमोल नाईक, संदेश जाधव, प्रशांत सातपुते, संदेश जाधव आदी उपस्थित होते.