प्रतिनिधी / कुरुंदवाड
पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने कुरुंदवाड शहरात महापुराचे पाणी शिरल्याने शुक्रवारी रात्रीच शहरातील कुटूंबे स्थलांतर करण्याचे काम सुरु आहे. बचाव कार्यासाठी कुरुंदवाड शहरात एनडीआरएफ व आर्मीचे जवान दाखल झाले असून या जवानांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आहे.
शनिवारी पहाटेच्या दरम्यान शहरातील शिवतीर्थ येथील रस्त्यावर एक ते दोन फुटापर्यंत पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच शहरातील शिकलगार वसाहत, 478 वार्ड यासह सखल भागात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री पासूनच कुरुंदवाड शहरातील नागरिक स्थलांतर होताना दिसत होते.
या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड या शहरात पालिका प्रशासनाने व पोलीस ठाण्याच्या वतीने महापुराच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना राबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी सकाळी पाण्याच्या पातळीत वाढ सुरूच असल्याने शहरात एनडीआरएफ व आर्मीचे जवान शहरात दाखल झाले. त्यांनी शहरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.