कुंभी कासारीचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांची मागणी
प्रतिनिधी / वाकरे
गेल्या तीन-चार वर्षात अतिरिक्त साखर उत्पादन, महापुरासारख्या विविध कारणांमुळे साखर उद्योग अडचणीत असून सुद्धा कारखान्यांना तोटे करून ऊस उत्पादकांना एफआरपी द्यावी लागत आहे, म्हणून केंद्र शासनाने ऊस उत्पादकांना एफआरपी देत असताना साखर कारखान्यांना सॉफ्टलोन ऐवजी उसाला प्रतिटन ५०० ते ६०० रुपये अनुदान द्यावे आणि उत्पादन खर्चावर आधारित एफआरपीप्रमाणे किमान साखर दर “एस” साखरेला ३५०० आणि “एम” साखरेला ३६०० रुपये करावा अशी मागणी कुंभी कासारीचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२०-२१ च्या मिल रोलर पूजन प्रसंगी चेअरमन नरके बोलत होते.अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन उत्तम वरुटे होते. चेअरमन नरके यांनी आगामी गळीत हंगामासाठी ५१९१ लागण आणि ४३५९ हेक्टर खोडवा अशी एकूण ९ हजार ५५० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाल्याचे सांगितले. केंद्र शासनाने सध्या असणारी ३१०० रुपये मिनिमम शुगर प्राइस येत्या एक ऑक्टोबरपासून ३३०० रुपये करण्याचे सूतोवाच केले आहे, मात्र जशी उत्पादन खर्चावर आधारित उसाची एफआरपी असते, तसे साखरेचे भाव उत्पादनखर्चावर आधारित असावेत आणि त्यासाठी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३५०० ते ३६०० रुपये करावा अशी मागणी त्यांनी केली. सध्या साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने इथून पुढे साखर उद्योग अडचणीत येऊ नये म्हणून उत्पादनखर्चावर आधारित साखरेचे दर द्यावेत, त्यामुळे साखर उद्योग अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
गत हंगामाची संपूर्ण एफआरपी यापूर्वीच आदा
कारखान्याने गेल्या हंगामातील उसाची संपूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना यापूर्वीच दिली असून आगामी हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील उत्पादकानी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन नरके यांनी केले.
यावेळी चेअरमन नरके यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला संचालक अॅड. बाजीराव शेलार, संजय पाटील, विलास पाटील, जयसिंग पाटील- ठाणेकर, जयसिंग पाटील- यवलूज, निवास वातकर, प्रकाश पाटील- आकुर्डे, पी.के.पाटील, आबा पाटील, आनंदराव माने, अनिता पाटील, माधुरी पाटील, सेक्रेटरी प्रशांत पाटील, चीफ अकाउंट अनिल यादव, शेती अधिकारी साळवी, सर्व अधिकारी उपस्थित होते.