क्वारंटाईन केंद्रातील गरीबांच्या कुटुंबियांची परवड, झोपडपटीतील नागरिकांचे दोन्ही बाजूंनी हाल
कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे
जिल्हय़ात प्रवेश केला की स्वॅब न घेता थेट क्वारंटाईन केंद्रात पाठवण्यात येते.चाचणीचा अहवाल येण्यासाठी तीन ते आठ दिवसाचा कालावधी लागत आहे.तोपर्यंत त्यांना केंद्रातच थांबावे लागत आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे. कोरोना या महामारीचा सामना करण्याबरोबरच हातावरचं पोट भरणं,या दोन्ही पातळीवर झोपडपटृय़ामधील नागरिकांसह त्यांच्या कुटुंबियांना लढावे लागत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा संसर्ग सुरु आहे.या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी 18 मार्च 2020 पासून देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला.तेव्हापासून देशात लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु आहे.आणखी दहा दिवसांनी लॉकडाऊनला सहा महिने पूर्ण होत असून अद्यापही सर्व व्यवहार सुरळित सुरु झाले नाहीत.लॉकडाऊनच्या या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला हवी होती.पण कमी होण्याऐवजी ही संख्या वाढली आहे. एकटय़ा कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येने 16 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर 20 ऑगस्टपर्यंत 463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सद्या परिस्थिती हाताबाहेर गेली असून प्रशासन कोव्हीडची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. प्रशासनाच्या या अपयशाचा फटका मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबांना बसत आहे.
जुलै आणि चालू महिन्यात सामूहिक संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरु असल्या तरी योग्य नियोजनाअभावी तोकडय़ा पडत आहेत. कोरोनाच्या या काळात गरीब कुटुंबांतील लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत याकडे कोणाचेही लक्ष नाही.शहरातील झोपडपटीत कोरोनाचा फैलाव झाला आहे.मुळातच झोपडपटीतील बहुतांश वर्ग हा कष्टकरी आहे.सकाळी कामाला गेल्यास रात्री घरात अन्न शिजते अशी कित्येक कुटुंबांची परिस्थिती आहे. अशा कुटुंबांत एखादा सदस्य पॉझिटिव्ह आल्यास संबंधित सदस्याला रुग्णालयात दाखल केले जाते.तर अन्य सदस्यांना क्वारंटाईन केले जाते.अशा कुटुंबांचे उत्पन्नच थांबते.संसर्ग झालेला रुग्ण आणि क्वारंटाईन केलेल्या त्याच्या कुटुंबांतील सदस्यांना पंधरा दिवसांनी घरी सोडल्यानंर त्यांच्यापुढे काही दिवस तरी गुजराण कशी करायची असा प्रश्न निर्माण होत आहे.अशा कुटुंबांतील लोकांच्या नातेवाईकांनी मदत केल्यास त्यांना आधार मिळतो.पण त्यांच्यामुळे आपल्यालाही संसर्ग होण्याच्या भीतीने अनेकजण बाधित नातेवाईकांबरोबरचा संपर्कच बंद करत आहेत.गेल्या दोन महिन्यात शहरातील सुमारे 90 ते 100 कुटुंबांना असा अनुभव आला असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. गरीबांना एकीकडे कोरोना महामारीची भीती आहे तर दुसरीकडे या महामारीने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे.यामुळे करायचे तरी काय असा प्रश्न गरीबांना सतावत आहे.
संसर्ग बाधित कुटुंबातील सदस्यांना रोजगाराची गरज
झोपडपटीत एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यास त्याची माहिती त्या परिसरात लगेच पसरते.तेव्हापासून बाधित कुटुंबांतील सदस्यांचे प्रचंड मानसिक खच्चीकरण होते.शेजारी ढुंकूनही पाहत नाहीत.तर कोणी त्यांना कामावरही घेत नाहीत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. ही उपासमारी थांबवण्यासाठी प्रशासनाने किमान त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
शासनाने लक्ष देण्याची गरज-रुपेश पाटील,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष
कोरोना संसर्गामुळे गरीबांचे मोठे हाल सुरु आहेत.एखाद्या गरीब कुटुंबांतील कर्त्यालाच संसर्ग झाल्यास त्या कुटुंबासमोर आर्थिक समस्या निर्माण होत आहेत.शासकीय रुग्णालयात उपचार केले जातात.पण बाधिताच्या कुटुंबाची त्याच्या उपचार काळात आणि रुग्ण बरा झाल्यानंतरही हेळसांड होत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही.यामुळे अशा गरीब कुटुंबांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.