काम चांगलेःपण नियोजन शून्य, कोल्हापूर महापालिकेतील कोरोना नियोजनाची स्थिती
बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
मार्च महिन्यापासून कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कोरोना योध्दा म्हणून रस्त्यावर उतरुन काम करत आहेत.पण काही ठराविक बेजबाबदारांमुळे संसर्गाचा फैलाव होत आहे या सदस्यांनी सभागृहात केलेल्या आरोपाला पुष्टी मिळत आहे.शहरातील कोव्हीड सेंटर,बेड,रुग्ण आणि मृत्यू संख्या या सर्वांची एकत्रित माहिती मिळण्यासाठी वॉररुम तयार करण्यात आली आहे.पण या वॉररुम मध्येच संवाद नसल्याचे दिसून येत आहे.परिणामी सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
कोल्हापूर शहरात मार्च ते मे या कालावधीत कोरोना संसर्गबाधितांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती.त्यावेळी महापालिकेची सर्व यंत्रणा जोमाने काम करत होती.एखाद्या भागात रुग्ण आढळून आल्यास यंत्रणेची धावपळ उडत होती.कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले.यामुळे या तीन महिन्याच्या कालावधीत कोरोनावर नियंत्रण होते. मात्र ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग दुप्पट झाला आहे.यामुळे महापालिकेकडून नियोजन पूर्वीपेक्षा चांगल्या पध्दतीने होण्याची गरज आहे.पण आजच्या घडीला महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे ढेपाळली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे 31 ऑगस्ट रोजी महापालिकेची कोरोनाच्या विषयावर विशेष सभा बोलावण्यात आली.या सभेत सदस्यांनी पालिकेतील 30 विभागप्रमुख निकामी झाले तर शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडेल अशी भीती व्यक्त करत ठराविक लोक बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप केला होता.त्यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटी यांनी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली.
महापालिकेची सभा होऊन चार दिवस झाले.पण पालिकेतील ठराविकांचा बेजबाबदारपणा कायम आहे. वॉररुममध्ये अद्याप ताळमेळ नाही.महापालिकेतील उपायुक्त,सहायक आयुक्त आणि कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्य,इस्टेट,केएमसी वर्कशॉप, तर पंचगंगा स्मशानभूमीतील एका रोजंदारी कर्मचाऱयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पालिकेतील कर्मचाऱयांचीच प्रशासनाकडे नोंद किंवा माहिती नाही.यामुळे सर्वसामान्यांची अवस्था काय असणार याचा अंदाज येतो.आरोग्याधिकारी,वॉररुममधील यंत्रणा यांच्यासह ज्यांच्याकडे कोरोनाची जबाबदारी देण्यात आली आहे ते सर्व आपल्याकडे माहिती नाही असे सांगत एकमेकांकडे बोट दाखवत आहे.यामुळे फक्त आयुक्त पळत असून इतर यंत्रणा काय करत आहे प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेचा कारभार राम भरोसे
कोरोनाचा संसर्ग वाढून परिस्थिती गंभीर होत आहे.पण महापालिका प्रशासन अद्याप गंभीर नाही.एकटे आयुक्त रात्रंदिवस पळत आहेत.पण प्रत्येकाला मर्यादा आहेत.महापालिकेची इतर यंत्रणा पूर्ण ढेपाळली असून नियोजन विस्कळित झाले आहे.सामान्य माणसाला बेड,व्हेंटिलेटरची माहिती कुठेच मिळत नाही.यामुळे त्यांची दमछाक होत असून सर्व कारभार राम भरोसे सुरु आहे.प्रशासनाने कोरोनाची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी नियोजन करायला हवे. – किरण नकाते,नगरसेवक