इचलकरंजीच्या कोरोनाग्रस्त मृतावर ‘बैतूलमाल’ च्या कार्यकर्त्यांनी केले कोल्हापुरात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी / कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणा आणि विचारातून वाटचाल करणाऱया कोल्हापूरची सामाजिक वीण कोरोनाच्या संकटातही घट्ट असल्याचे पुन्हा एकादा स्पष्ट झाले. इचलकरंजीतील एका कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृत्यु झाला. त्याच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने पंचगंगा स्मशानभूमीत कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल कमिटीच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार करून सामाजिक ऐक्याची परंपरा जपली.
इचलकरंजी येथील एका वृद्धाचा सोमवारी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. या मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते रवी जावळे यांनी काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना संपर्क केला. कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल कमिटीचे जाफरबाबा सय्यद यांनी तात्काळ तौफिक मुल्लाणी यांचेसमवेत राजू नदाफ, जाफर मलबारी, जावेद सनदी, जाफर महात यांना तात्काळ पंचगंगा स्मशानभूमीत जाण्यास सांगितले. सीपीआरमधून शववाहिकेतून मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत आणण्यात आला. त्य़ावेळी काही नातेवाईक उपस्थित होते पण कोरोना भीतीमुळे कोणीही पुढे येण्याचे टाळत होते. स्मशानभूमीत राजू नदाफ, जाफर मलबारी व महानगरपालिकेचे दोन कर्मचारी अशा चौघांनी पीपीई कीट घालून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
शुक्रवारी राजापूर येथील मुस्लिम बांधवाचा दफनविधी केला होता आणि सोमवारी पंचगंगा स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करीत बैतूलमाल कमिटीच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगाम विचारांची जपणूक करत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.