वाकरे / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील वाकरे येथील ग्रामपंचायतीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आणि भोगावती नदीचे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी घरोघरी जाऊन ट्रॅक्टर ट्रेलरद्वारे गौरीचे निर्माल्य आणि मुखवटे जमा करून एक विधायक उपक्रम राबवला. या उपक्रमाचे कौतुक होत असून त्याला ग्रामस्थ आणि महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
वाकरे गावचे सरपंच वसंत तोडकर यांनी गुरुवारी सकाळी गावातील व्हाट्सअपग्रुपवर सोशल मीडियाद्वारे ग्रामपंचायत कर्मचारी प्रत्येक गल्लीत घरोघरी जाऊन निर्माल्य गोळा करणार असल्याचे जाहीर केले होते. या उपक्रमाला ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीने तीन ट्रॅक्टर ट्रेलर आणि कर्मचाऱ्यांद्वारे प्रत्येक गल्लीत घरोघरी जाऊन गौरीचे निर्माल्य, मुखवटे आणि मातीच्या गणपतीच्या मूर्ती हे सार जमा केले. या उपक्रमाला गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला. गावात कोरोनाच्या संसर्ग होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने हा विधायक उपक्रम राबवला. तसेच या उपक्रमाद्वारे भोगावती नदीचे होणारे प्रदूषण काही अंशी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे प्रतिवर्षी नदीमध्ये टाकले जाणारे साहित्य, निर्माल्य एकत्र जमा करण्यात आले आणि याची विल्हेवाट अन्यत्र करण्यात आली. अशाप्रकारे कोरोना संसर्ग रोखण्याचा विधायक उपक्रम वाकरे गावात राबविण्यात आला. या उपक्रमासाठी उपसरपंच शारदा पाटील, ग्रामविकास अधिकारी संभाजी पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.