बेळगांव येथील दोन सख्या भावांचा संतापजनक प्रताप
प्रतिनिधी / कोल्हापूर
लग्नानंतर कौमार्य चाचणीत वधु अयशस्वी ठरल्याने दोघा सख्या बहिणींना दोघा सख्ख्या भावांनी बेळगाव येथून हाकलून दिल्याचा संपप्त घटना गुरुवारी उघडकीस आली. लग्नानंतर अवघ्या ३ दिवसातच बहिणींना कोल्हापूरला परत पाठविले यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला. याबाबत रात्री उशिरा पर्यंत बेळगांव येथील सख्या भावांसह त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुर शहरातील दोन सख्ख्या बहिणींचे लग्न बेळगांव येथील संदीप सनी गागडे व सुरजीत सनी गागडे (रा. हनुमाननगर, बेळगाव) या सख्या भावांसोबत २७ नोव्हेंबर २०२० रोजी झाले होते. एकाच समाजातील दोन्ही कुटूंबिय असल्याने त्यांच्यात कौमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार घेतलेल्या या चाचणीत एक मुलगी अयशस्वी ठरल्याचा आरोप तिच्या पतीने केला. संबंधित मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींकडून त्यांच शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू होते. विवाहानंतर ३ दिवसांनी त्या दोनही बहिणींना सासरच्या मंडळींनी घरातून हाकलून माहेरी पाठवले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी दोनही कुटूंबामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलींना पुन्हा नांदवण्यासाठी सासरच्या लोकांनी पैशांची मागणी केली. मुलीच्या कुटूंबियांनी पैसे देण्यास नकार दिला. यानंतर ३ फेब्रुवारी २०२१ रोजी कोल्हापुरात जात पंचायत बसविण्यात आली. पंचायतीनेही त्या दोन मुलींना काडीमोड झाला असल्याचा निर्णय दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत दरम्यान जात पंचायतीनेही मुलीच्या कुटूंबियांना काडीमोड झाल्याचे सांगितल्याने कुटूंबिय हतबल झाले. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दाद मागितली. समितीच्या सीमा पाटील, गीता हसुरकर, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणी संदीप व सुरजीत या सख्ख्या भावांसह त्यांची आई शोभा, मामा ईश्वर गागडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. |