श्री दत्त कारखाना व दत्त उद्योग समूह शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील चेअरमन गणपतराव पाटील यांची ग्वाही
प्रतिनिधी / शिरोळ
भूमिगत निचरा प्रणाली या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांतर्गत अनेक जमिनी सुपीक होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. राजकारण विरहित स्वच्छ मनाने सर्वांनी मिळून क्षारपड जमीन क्षारमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येणे आवश्यक असून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी श्री दत्त कारखाना व दत्त उद्योग समूह शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले.
श्री दत्त साखर कारखाना उद्योग समुह तसेच डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेच्या सहकार्याने कागवाडसह औरवाड, बुबनाळ व हेरवाड परिसरातील सुमारे आठशे एकर क्षारपड नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हेरवाड (ता. शिरोळ) येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
गणपतराव पाटील पुढे म्हणाले, चार वर्षांपूर्वी या भागातील नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज होती. शेतीसाठी जमीन चांगली व्हावी व शेतकऱ्यांचे हित जोपासावे या उद्देशाने काही शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. मात्र, आज शेतकरी जागरुक झाले आहेत. आर्थिक उत्पन्न वाढणार आहे ही दृष्टी समोर ठेवून शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा. कोरोना महामारी संकट काळातही शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती देऊन प्रोत्साहन देण्यात आले असून दत्त कारखाना उद्योग समूह शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे. एकरी २०० टनांचे उद्दिष्ट ठेवून दत्त कारखाना उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. या ऊस पीक वाढीबरोबर सेंद्रिय शेती, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्न केला जातअसे सांगून त्यांनी दत्त कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे सांगितले.
श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार म्हणाले, सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपली प्रगती करण्याचे उद्दिष्ट घेऊन गणपतराव पाटील हे काम करीत आहेत. क्षारपड जमीन मुक्तीच्या या कामाचे कौतुक राज्याचे कृषी आयुक्त एकनाथ डवले यांनी करून हे आदर्श मॉडेल राज्यभर लागू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. क्षारमुक्तीच्या या योजनेत शेतकऱ्यांनी निष्ठा ठेवून आणि गणपतराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून काम करणे आवश्यक आहे. सरपंच सूरगोंडा पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून क्षारपड जमीन प्रश्नी करत असलेल्या कामाचा आढावा घेऊन शासकीय योजनेचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. माझी पंचायत समिती सभापती मिनाज जमादार यांनी या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतो याची माहिती दिली. तर प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांनी गणपतराव पाटील यांनी हे बिघडलेली नाती आणि माती दुरुस्त करण्याचे काम करीत असल्याचे सांगून चांगुलपणाच्या त्यांच्या कामाच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले. जमीर मुल्ला यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी जयसिंगपूर उदगाव बँकेचे संचालक दिलीप पाटील, दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, हेरवाड उपसरपंच मुक्ता पुजारी, औरवाड येथे जयवंत कोले, सरपंच अक्षरफ पटेल, उपसरपंच नितीन शेट्टी, सुभाष शहापूरे, जयपाल आगरे, प्रतापराव आगरे, शमशुद्दीन पटेल, मुस्ताक पटेल, मल्लाप्पा ऐनापुरे, बाळासो रावण, साहेबपाशा पटेल, अस्मत पटेल आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.