प्रतिनिधी/ सातारा
भारत एक वेलफेअर स्टेट आहे. लोकतांत्रिक भारतातील पुरोगामी महाराष्ट्रात न्यायदानाचे कार्य अधिक सुलभ झाले पाहीजे. कायद्याच्या राज्यामध्ये जलदगतीने, .वेळेची आणि पैशाची बचत होवून, नागरीकांना न्याय मागता आला पाहीजे. त्यासाठी कोल्हापूर येथे मे.मुंबई उच्य न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला लढा हा अधिवक्त्यांबरोबरच पक्षकार जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या लढयाला आमचा जाहिर पाठींबा आहेच परंतु आम्हास जे काही करावे लागेल ते सर्वकाही निश्चितपणे आमच्याकडून केले जाईल अशी ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
मुंबई उच्य न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या अध्यक्ष ऍड.गिरीश खडके,सचिव ऍड. विजयकुमार तोटे-देशमुख आणि पदाधिकारी यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे कोल्हापूर येथे उच्यन्यायालयाचे खंडपीठ स्थापन होणेबाबत कृती समितीच्या पुढील कार्यवाहीची माहीती दिली त्यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बोलत होते.
सोलापूर, सातारा- सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी हे सहा जिल्हे भौगोलीकदृष्टया सलग्न आहेत आणि कोल्हापूर हे साधारण या सहा जिल्हयांसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. कोल्हापूर येथे मुंबई उच्य न्यायालयाचे खंडपीठ झाल्यास, वकीलांना आणि पक्षकारांना अत्यंत सोयीचे होणार आहे. पक्षकारांना उच्यन्यायालयात दाद मागण्याची असल्यास सध्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पणजी या चारच ठिकाणी उच्य न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येत आहेत. गेल्या 20 वर्षापासुन ही उच्य न्यायालयाची व्यवस्था आहे. सध्याची लोकसंख्या, वाढते खटल्याचे प्रमाण आणि जलद न्याय यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ झाल्यास, ते सर्वानाच अतिशय सोयीचे होणार आहे. आजच्या घडीला न्याय मागण्यासाठी सुध्दा एक प्रकारे अन्याय होत असल्याची भावना सर्वसाधारण पक्षकारांना वाटते. त्यासाठी तातडीने खोल्हापूर येथे खंडपीठ होणे आवश्यक आहे. वकील,पक्षकार यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. न्याय मागणे अधिक सापे होणार आहे. त्यामुळे आमचा सर्वांर्थांने कृती समितीला पाठींबा राहीला आहे आणि येथुन पुढेही राहणार आहे. कोल्हापूर खंडपीठाकरीता जे काही करायचे असेल ते सर्वार्थांने आम्ही करु अशी ग्वाही देखिल यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
.