प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे हा प्रश्न प्रलंबीत आहे. या प्रश्नी 15 दिवसांत केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी खंडपीठ कृती समितीची दिल्ली येथे बैठक आयोजीत करु असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले. तसेच हा प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ऍड. गिरीष खडके, बार असोसिएशनचे सचिव ऍड. विजय ताटे – देशमुख, माजी अध्यक्ष ऍड. अजित मोहिते, ऍड. शिवाजी राणे, ऍड. व्ही. आर. पाटील, ऍड. इंद्रजीत चव्हाण अदि उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन व्हावे ही मागणी गेल्या 3 दशकापासून प्रलंबीत आहे. ही मागणी योग्य आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलकत्ता येथील खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येत्या 15 दिवसांत या प्रश्नी केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी खंडपीठ कृती समितीची बैठक दिल्ली येथे आयोजीत करु असे आश्वासन त्यांनी दिले.