प्रतिनिधी / खोची
खोची ता. हातकणंगले परिसरातून वाहत असलेल्या वारणा नदीला आलेला पूर ओसरत आहे. या पुराच्या पाण्यामूळे गणेश व भैरवनाथ मंदिर परिसरात तसेच नागरी वस्तीत पाण्यातून घाण वाहून आली होती. त्यामुळे जवळच्या नागरी वस्तीत दुर्गंधी पसरली होती. याची तात्काळ दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने जेसीबी मशिनने परिसरातील घाण भरून नेली. तसेच रस्त्यावर पाण्याबरोबर आलेले उकिरडे, पालापाचोळा बाजूला करून स्वच्छता मोहीम राबविली. परिसर दुर्गंधीमुक्त केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
येथील काटकर वस्ती, गणेश मंदिर परिसरात नागरी वस्ती आहे. पूराच्या पाण्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर घाण वाहून आली होती. पाणी कमी झाल्याने घाण तशीच शिल्लक राहिली होती. पाण्यामुळे घाणीचा उग्र वास सुटला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली होती. कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक आरोग्याची काळजी घेत आहेत. परंतु वाहून आलेल्या घाणीमुळे लहान मुलांना त्रास होत होता. नागरिकांनी याबाबत स्वच्छतेची मागणी केली होती. याची दखल घेत तात्काळ ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता केली. यासाठी प्रशासक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी आर. एस. मगदूम, लिपिक महावीर मगदूम, अरविंद पोवार, कर्मचारी लक्ष्मण ढाले, संजय शिंदे यांनी परिसरातील नागरिकांच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम राबविली.