वार्ताहर / उचगाव
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील तेजस्विनी किरण मोरे (वय २४), अक्षरा उर्फ काव्या (वय ३) या माय-लेकीने आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला असावा, असा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे. यामुळे अज्ञातावर गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास गतिमान केला आहे.
बुधवार दि. १४ रोजी सकाळी तेजस्विनी मुलीसह घरातून बेपत्ता झाली. याबाबत कुटुंबीयांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुरुवार दि. १५ रोजी दुपारी त्या दोघींचा मृतदेह तेजस्विनीचे वडील दाजी महादेव गिरुले यांच्या विहिरीत तरंगताना दिसला. दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले.
गळा दाबल्याने त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे अतिरिक्त पोलीसप्रमुख तिरुपती काकडे यांनी गांधीनगर पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर आर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी गडमुडशिंगीमध्ये घटनास्थळी व परिसरात भेट देऊन तपासाचे दुवे शोधले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव मलमे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञातावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडमुडशिंगी येथील दाजी महादेव गिरुले यांची मुलगी तेजस्विनीचा विवाह चार वर्षापूर्वी सांगवडेवाडी येथील किरण मोरे यांच्याशी झाला होता. त्यांना अक्षरा उर्फ काव्या नावाची तीन वर्षाची मुलगी आहे. मुलगी झाल्यानंतर घरी वाद होऊ लागले. दोन वर्षांपासून तेजस्विनी मुलीसह गडमुडशिंगी येथे माहेरी रहात होती. न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या मायलेकीचा खून नेमका कोणी केला, याबाबतचा गुंता वाढला असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.