पोलीस आणि अन्न् औषध प्रशासन करतय अर्थपूर्ण कानाडोळा
प्रतिनिधी / उचगाव
गुटखा विक्रीसाठीची मुख्य केंद्र अशी नवी ओळख गांधीनगर (ता. करवीर) व्यापारपेठेची होत आहे. काही लोकांनी या बाजारपेठेतून गुटखा विक्रीचे मोठे जाळे निर्माण केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागातून येणारा गुटखा अवैध मार्गाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पोहोचत आहे. अगदी राजरोसपणे याठिकाणी गुटख्याची विक्री सुरु असते.गांधीनगर पोलिसांनी तसेच अन्न् औषध प्रशासनाने अर्थपूर्ण कानाडोळा केल्यामुळे खुलेआम व्यवसाय फोफावला आहे.
दररोज सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये किंमतीच्या गुटख्याची विक्री आणि वाहतूक या बाजारपेठेतून जवळपासच्या तीन ते चार जिल्ह्यांमध्ये होत असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याची आयात जवळील बेळगाव आणि सांगली जिल्ह्यातील कर्नाटक राज्य सीमा भागातून गांधीनगरला होते. येथील काही गोदामांमध्ये हा गुटखा साठवून ठेवला जातो. दररोज हा गुटखा कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. छोट्या व्हॅन्स् किंवा मोटारींमधून या गुटख्याची पहाटे पहाटे वाहतूक होते. हा गुटखा छापील किंमतीच्या तिप्पट ते चौपट दराने विकला जातो. काहीवेळेस किंमत चौपटीपेक्षाही जास्त होते. किंमतीच्या या तफावतीमधील जवळपास पंच्याहत्तर टक्के नफा घाऊक विक्रेत्याला मिळतो तर पंचवीस टक्के नफा किरकोळ स्टॉल किंवा दुकानदार मिळवितात.
घाऊक विक्रेते नफ्यातील काही भाग गुटखा उत्पादकांच्यापर्यंत पोहोच करतात. कोल्हापूरजवळील ठिकाण म्हणून गांधीनगरला गुटखा विक्रीच्या व्यापारात मोठे महत्व आले आहे. गुटख्याची घाऊक बाजारामध्ये विक्री करणारे काही नेहमीचे व्यापारी आहेत. भोगडी, चांड्रूमल, लालू हंडी, राकेश , रोशन, विजू चप्पल अशा काही घाऊक व्यापाऱ्यांकडे हा गुटखा येतो आणि त्यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्रात हा गुटखा विक्रीसाठी जातो असे समजते. गुटखा विक्री बंद करणे अवघड नाही परंतु अन्न आणि औषध प्रशासनाने त्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. पोलिसांनीही इच्छा शक्ती दाखविल्यास गुटख्याचे साम्राज्य उद्ध्वस्त होवू शकेल. अगदी जबाबदारी घेऊन गुटख्याची अवैध वाहतूक, विक्री सुरु असल्यामुळे समांतर अर्थव्यवस्था निर्माण होऊन त्याव्दारे अर्थपूर्ण पाठिंबा या व्यवसायाला मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.