वार्ताहर / उचगांव
गांधीनगर (ता.करवीर) वीज वितरण कार्यालयात सुरू असलेला अनागोंदी व निष्क्रीय कारभार कधी सुधारणार, तीन तीन दिवस घरगुती विज खंडित का होते, असा सवाल शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी गांधीनगर वीज वितरण कार्यालयात साहाय्यक अभियंता निवास गावडे यांना केला. पुन्हा असा प्रकार झाल्यास शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
किमान दीपावली सणाला तरी व्यापार पेठेत अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी देण्यात आले. शिरू चौक परिसरात ६५ तास खंडित झालेल्या विजेमुळे रुग्णांचे हाल झाले. जे रुग्ण ऑक्सिजन वर होते त्यांना वीज खंडीत झाल्याने ऑक्सिजन मिळाला नाही. त्यांच्या प्रकृतीवर दूरगामी परिणाम झाला. लहान बालके उकड्यामुळे अस्वस्थ झाली, पण दुरुस्तीचे नाव पुढे करून येथील कार्यालय नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. ६५ तास अशी कोणती दुरुस्ती ते करत होते याचे उत्तर द्या असा सवाल शिवसैनिकांनी केला. या कार्यालयातील अधिकारी फोन उचलत नाहीत. उचलला तर व्यवस्थित उत्तरे त्यांच्याकडून मिळत नाहीत. एकूण कारभारच गोंधळाचा व ढिसाळ आहे, असा आरोपही शिवसैनिकांनी केला.
सामान्य ग्राहकांना वीज मीटर तक्रार करूनही मिळत नाहीत. मात्र एजंटांना ती ताबडतोब मिळतात. एजंट व अधीकाऱ्यांच्या चक्रव्यूहात सामान्य ग्राहकांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. तक्रारींचे निराकरण होत नाही, विविध कारणासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत, किरकोळ दुरुस्तीही वेळेवर होत नाही, अशा असंख्य ग्राहकांच्या तक्रारींचा पाढा शिवसैनिकांनी वाचला. गांधीनगरचे शाखा अभियंता सुतार उपस्थित नसल्याने बापट कॅम्प येथील सहाय्यक अभियंता निवास गावडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटाणी, बाळासाहेब नलवडे, बाबुराव पाटील, सुनील पारपाणी, किशोर कामरा, भूषण चौगुले, किरण शिंगे, पवन गजवाणी, मनोज शिंदे, प्रफुल्ल घोरपडे, दिलीप कुकरेजा आदी उपस्थित होते.