विजय पाटील / असळज
कोल्हापूर जिल्ह्यातील १०३९ ग्रामपंचायतीमध्ये ८५० च्या आसपाससंगणक परिचालक (केंद्रचालक) कार्यरत आहेत. त्यामध्ये काही ग्रामपंचायती मध्येच इंटरनेट सुविधा उपलब्ध असून उर्वरित ठिकाणी काम करणारे संगणक परिचालक (केंद्रचालक) यांना कधी कधी तब्बल १४-१५ किमीपर्यंत धावपळ करावी लागते त्यामुळे लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतमध्ये बसवलेली इंटरनेट सुविधा चालू होणार तरी कधी असा प्रश्न संगणक परिचालक याबरोबरच पदाधिकारी व ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे “ग्रामपंचायती ऑफलाईन व कामे मात्र ऑनलाईन” अशी परिस्थिती संगणक परिचालकांची झाली आहे.
सद्याचे युग हे डिजीटल असून सगळीकडे संगणकीय वापर होवू लागला आहे. डीजीटल इंडियाचा नारा देणाऱ्या सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून केंद्र शासनाने गेली तीन-चार वर्ष प्रत्येक ग्रामपंचायती ऑनलाईन करण्याच्या केलेल्या प्रक्रिया संथ गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती अजूनही ऑफलाईनच आहेत. संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र संगणकीय करण्याचे आश्वासन देणारे सरकार ग्रामपंचायतीना इंटरनेट सुविधा देणार तरी कधी ? तर ऑनलाईनच्या कामकाजाचा डांगोरा पिटणारे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष तरी देणार का ? नोव्हेंबर २०११ पासून आजतागायत ग्रामपंचायत कार्यालयांमार्फत संग्राम प्रकल्प अंतर्गत ग्रामसेवा / संग्राम केंद्रा मार्फत ई-पंचायत प्रकल्पाचे काम सुरु होते. परंतु शासनाने ग्रामविकास विभागाचा निर्णय ११ ऑगस्ट २०१६ नुसार संग्रामकेंद्रा ऐवजी CSC-SPV (केंद्र शासनाद्वारे प्रेरित उपक्रमा मार्फत) आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
या केंद्राद्वारे नागरिकांना विविध प्रशासकीय विभांगातर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले त्यांच्या रहिवाशी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळावे तसेच इतर व्यावसायिक सेवा, बँकिंग सेवा (G2C Vव H2C) ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्यात या हेतूने प्रत्येक गावात आपले सेवा केंद्र सुरु केली आहेत. त्यावेळी ‘इ-ग्राम सॉफ्ट’चे कामकाज ऑफलाईन करून त्याचा तो डाटा ऑनलाईन करण्यात येत होता.परंतु अजूनही जिल्ह्यातील कित्येक ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट नसल्याने संगणक परीचालकांचे कामकाज करण्यासाठी इंटरनेट कॅफेमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. कधी कधी स्वतः मोबाईल वापरून मोबाईल टॉवरचा वापर करून इंटरनेट वापरावे लागत आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा चालू झाल्यास वीज बिल भरणा, ऑनलाईन बँक सुविधा, ७/१२, ग्रामीण विविध जीवनापयोगी साहित्य, महसूल विभागातील कामे व इतर अनेक ऑनलाईन कामे ग्रामपंचायतीमध्ये सुरु होवू शकतात. परंतु, इंटरनेट हाच मोठा अडथळा होवून बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कित्येक ग्रामपंचायतीनी BSNLच्या इंटरनेट सुविधाच्या त्रासाला कंटाळून त्यांची इंटरनेट सुविधा बंद केली आहे. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतीच्या दारापर्यंत आलेली ४ जी केबलमध्ये इंटरनेट सेवा चालू होण्याची फक्त प्रतीक्षा संपणार कधी याकडे संगणक परिचालकाचे लक्ष लागले आहे.
संगणक परिचालक सात-आठ महिने पगाराच्या प्रतीक्षेत
ग्रामीण भाग इंटरनेट सक्षम झाल्यास सर्व ऑनलाइन सुविधा ग्रामीण स्तरावर नागरिकांना मिळणार आहेत. त्याचा लाभ सर्व नागरिकांना होणार आहे. डिजीटल इंडिया करणारे संगणक परीचालाकांचा गेली सात-आठ महिने मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागात प्रामाणिक काम करणाऱ्या संगणक परीचालाकाना शिपाई पगारापेक्षा कमी पगारात राबवत असल्याने हि एक प्रकारे शोकांतिका आहे.त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
–प्रकाश कांबळे, जिल्हा अध्यक्ष संगणक परिचालक कोल्हापूर