वीस हजाराच्या घरातील लोकसंख्येचे गाव वाऱ्यावर, गावाला वाली कोणीच नाही ?
प्रतिनिधी / चंदुर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये जिल्ह्यातील लहान मोठ्या खेड्यातही कोरोनो ने थैमान घालायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी खेडी आप आपली कोविड सेंटर उभारत आहेत. कारण जिल्ह्यात कोरोनोचा प्रभाव अधिक वाढल्याने सर्वत्र आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होऊन अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत. या कारणाने अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. चंदूर गावची लोकसंख्या जवळपास वीस हजाराच्या घरात आहे. या गावात 5 जुलै रोजी पहिला कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर बरोबर 2 महिन्यानंतर गावाने कोरोनोबाधितांची शंभरी पूर्ण केली आहे.
या दोन महिन्यात गावातील सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात गावचा विकास साधणारा लोकप्रतिनिधी, एक डॉक्टर, एक अभियंता आदी महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर याचा सर्वाधिक फटका मूळच्या चंदूर गावभागाला बसत असुन तेथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. या अनुषंगाने आणखी कोणाचाही मृत्यू होऊ न देता गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी गावच्या पुढाऱ्यांनी घेतली पाहिजे.
अशा आणीबाणीच्या प्रसंगी गावातील सर्वांनी राजकीय मतभेद विसरून कोरोनो नियंत्रणात आणण्यासाठी फक्त चर्च्या करत न बसता प्रत्यक्ष कृती करून कमीत-कमी 20 बेडचे तरी कोविड सेंटर उभारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत व जोपर्यंत सेंटर उभे राहत नाही तोपर्यंत गावातील ॲम्बुलन्स ऑक्सिजनसह सुसज्ज स्वरूपात प्रशासक रामाणा यांनी तयार करून ठेवावी अशी गावातून मागणी होत आहे.
आज गावात सर्व समाजाची समाज मंदिरे मोकळी आहेत. यात दोन मोठी मंगल कार्यालय आहेत ती गावचा लोकांसाठी खुली करून गावातील गरीब व मध्यमवर्गीय लोकांची बेडसाठी होणारी वणवण थांबावी त्याचबरोबर बाहेर पॅकेज स्वरूपात होणाऱ्या उपचारपद्धतीचा फटका न बसता त्यांची होणारी लूट थांबावी व उपचार लवकरात लवकर व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.