पांगिरे ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामूळे १४ प्रवाशांचे जीव वाचले
पिंपळगाव / वार्ताहर
वाहन चालकाचा अतिआत्मविश्वास कधी कधी कसा अंगलट येतो याचा थरारक अनुभव पांगिरे (ता. भुदरगड) येथे अनुभवास मिळाला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून एका खाजगी बसमधील १४ जणांचे प्राण वाचवण्यात येथील युवकांना यश आले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच काहीशी परिस्थिती होती. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पांगिरे येथील स्थानिक जिगरबाज युवकांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व मोठा अनर्थ टळला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोवा येथून कोल्हापूरकडे जाण्यासाठी ही नेपाळ वासियांची खाजगी बस गारगोटी- गडहिंग्लज राज्यमार्गावर पांगिरे पुलावर गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता आली. काल या पुलावर मुसळधार पावसामुळे पाणी आले असतानाही तसेच या रस्त्याचा अंदाज नसलेने बस चालकाने बस पाण्यात घातली.पण पाण्याचा प्रवाह मोठा असलेने चालकाला बस पुढे नेता आली नाही. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने बस वाहून जाऊ लागली व ही बस पुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्याला जाऊन अडकली. त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना आपण पाण्यात अडकल्याची कल्पना आली आणि त्यांनी जोरदार आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. पांगिरे येथील दिगंबर पाटील याला त्यांचा आवाज एकू आला. दिगबर याने लगेच अमोल चव्हाण याना फोन केला. ही बातमी सर्वांना समजताच अनेक युवक, ग्रामस्थ नदीवर धावत गेले. खाजगी बसमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु केले.
पाण्याचा वेग खूपच होता. त्यामुळे अडकलेल्या बसपर्यंत जाणे इतकं सोपे नव्हते.यावेळी नदीच्या अलीकडे एक मालवाहू ट्रक उभा होता. त्या ट्रकला रोप बांधून त्याच्या साह्याने रोप घेऊन हे सर्व युवक बसजवळ पोहोचले आणि जीवाची बाजी लावून या जिगरबाज युवकांनी तासाभराच्या अथक परिश्रमानंतर बसमध्ये असणाऱ्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळवले. पांगिरे गावचे भैरू चव्हाण, अमोल चव्हाण निलेश भराडे, दिगंबर पाटील, निखिल भराडे, अमोल हसुरकर, संकेत बोरनाक, नामदेव गडकरी व मालगाडी चालक यांनी या प्रवाशांचे जीव वाचवले. विशेष म्हणजे हे सर्व प्रवाशी नेपाळ ता देशातील असून गोवा येथून ते कोल्हापूर व पुढे जाणार होते. सर्वच वाहतूक बंद असलेने या सर्वांची भोजनाची व्यवस्था पांगिरे ग्रामस्थांनी केली आहे.