वार्ताहर / पिंपळगाव
गेले अनेक दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चिकोत्रा धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. आरळगुंडी पठार व म्हातारीचे पठार येथून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरणक्षेत्र परिसरामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीपातळी वाढत असल्याने वीजनिर्मिती केंद्रातून सुमारे १०० क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
भुदरगड ,आजरा ,व कागल तालुक्यास वरदान ठरलेले झुलपेवाडी येथील चिकोत्रा धरण यावर्षी गणेश चतुर्थीमध्ये पुर्णतः भरले आहे . धरणात १५२२ द.ल.घ.फु.इतका पाणीसाठा झाला असून पाणीपातळी ६८७ मी. इतकी झाली आहे. धरणातील पाणीपातळी वाढत असल्याने रविवारपासून टप्प्याटप्प्याने पाणी विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली.
वीजनिर्मितीकेंद्रातून १०० कुसेसने पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून नदीकाठावर असलेल्या शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे खात्यामार्फत करण्यात आले आहे. म्हातारीचे पठार व आरळगुंडी पठारावरील पाणी धरणाकडे येत आहे. धरणक्षेत्रात १ जून २०२० पासुन आजअखेर एकूण १७७३ मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी ६ ऑगस्ट रोजी जोरदार संततधार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तर गतवर्षी एकूण ३२५७ मिलीमिटर इतका पाऊस झाला होता. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून म्हातारीचे पठार आणि आरळगुंडी पठारावरून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढत आहे.