पुलाची शिरोली/ वार्ताहर
ऊस लागवडीचे क्षेत्र वाढतआहे पण ऊस उत्पादन वरचेवर घटत चालले आहे. घटत जाणार्या या अडचणीवर मात करायची असेल तर नव – नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन छत्रपती राजाराम कारखान्याने नुकतेच छत्रपती राजाराम ऊस विकास अभियानाला सुरुवात केली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर होणाऱ्या ऊस उत्पादन वाढीच्या प्रयोगाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि जमिनीची सुपीकता वाढवून, बियाणे निवडीपासून ऊस तोडीपर्यंत नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करावा . याबाबत संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविणे हा उद्देश आहे. तो आम्ही पूर्ण करणारच असा ठाम विश्वास माजी आमदार व कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी लाटवडे येथे बोलताना व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी आयोजित या सभेत बोलत असताना वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चे माजी ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने – पाटील म्हणाले , उत्पादनाच्या बाबतीत जागतिक पातळीवर अनेक संशोधने झाली आहेत. या संशोधनाच्या आधारे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक ऊस तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कारखान्याच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांची भरघोसव दुप्पट ऊस उत्पादनाकडे वाटचाल होईल.
कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने म्हणाले, आम्ही ऊस उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न व प्रयोग करणार आहोत. त्यास ऊस उत्पादक शेतकरी राजाने सहकार्य करावे. या प्रसंगी चेअरमन श्री. सर्जेराव माने , माजी चेअरमन शिवाजीराव पाटील, उत्तम पाटील, अमर पाटील, श्रीकांत पाटील, संचालक दिलीप पाटील, सिद्धू नरबळ, श्री बिरदेव तांनगे , पत्रकार विनोद शिंगे आदीसह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.