विविध व्यापारी, विक्रेते ठेवणार व्यवसाय सुरु
शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वार रोडवरील व्यापारी संघटनांचा बंदला विरोध, रिक्षाही धावणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेने दहा दिवसांचा ऐच्छिक तर चेंबर ऑफ कॉमर्सने सहा दिवसांचा जनात कर्फ्यू जाहीर केला. चेंबरच्या कर्फ्यू बैठकीत रेडीमेड कापड व्यवसायिकांनी विरोध केला. यापाठोपाठ आता राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोडवरील व्यापारी, व्यवसायिक यांनीही जनता कर्फ्यूला विरोध दर्शविला आहे. तर शिवाजी पेठेत दहा दिवस कर्फ्यू असून व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यान जनता कर्फ्यूवरुन सकारात्मक आणि विरोधात्मक वातावरण निर्माण झाल्याने शहरवासिय संभ्रमात पडले आहेत. शहरातील व्यवहार सुरु राहणार की बंद असा प्रश्न त्यांच्यामधून उपस्थित होत आहे.
जिल्हय़ातील कारोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सहा तालुक्यात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. त्यांच्यासोबत शहरातही जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्सने घेतला. यासाठी घेतलेल्या बैठकीमध्येच बंद करण्यावरुन हमरी-तुमरी झाली. रेडिमेड कापड व्यवसायिकांनी कर्फ्यूला विरोध दर्शवत बैठकीमधून काढता पाया घेतला. यानंतर महापालिकेत झालेल्या बैठकीत महापौर निलोफर आजरेकर यांनी दहा दिवसांच्या ऐच्छिक जनात कर्फ्यूची घोषणा केली. यामुळे जनता कर्फ्यूची तीव्रता कमी झाली. यानंतर एका पाठोपाठ एक व्यापारी संघटनांनी बंदला विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे जनता कर्फ्यूचे पालन होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
महाद्वार रोड व्यापारी, रहिवासी संघाची स्वाक्षरी मोहिम
महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी संघाने गुरुवारी स्वाक्षरी मोहिम राबवत जनता कर्फ्यूला विरोध दर्शविला. कोरोना पार्श्वभूमीवर शहरात 21 मार्चपासून प्रशासनाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला व्यापाऱयांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. मात्र सध्या राज्यशासनाचा बंद करण्याबाबत कोणताही आदेश नसताना काही जणांकडून मनमानी पद्धतीने बंदचा घाट घातला जात आहे. त्यामुळे कोरोनाचे कारण पुढे करत लादल्या जाणाऱया जनता कर्फ्यूला विरोध असल्याचे महाद्वार रोडवरील व्यापाऱयांनी स्पष्ट केले आहे.
शाहूपुरीतील व्यवहार राहणार सुरु
शाहूपुरीतील सर्व तरुण मंडळे, दुकानदार, व्यापारी, ट्रान्सपोर्ट, खत विक्री व्यवसायिक यांच्या झालेल्या बैठकीमध्येही जनाता कर्फ्यूला विरोध करण्यात आला. यामुळे शाहूपुरीतील सर्व व्यवसाय, व्यवहार सुरु नियमितपणे सुरु राहणार आहेत. शाहूपुरी शहरतील एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजरपेठेवर व्यापारी, व्यवसायिक यांच्यासह हजारो कुटुंबांचा उदरनिवार्ह चालतो. यासर्व बाबींचा विचार करुन शाहूपुरीतील सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला नगरसेवक दिलीप शेटे, मनपा शिवसेनेचे गटनेते राहूल चव्हाण, अमर समर्थ, धीरज समर्थ, दौलत कारंडे, संग्राम घराळ आदींसह व्यापारी, नागरिक उपस्थित होते.
शिवाजी पेठेत जनात कर्फ्यू
शहरात एकीकडे जनात कर्फ्यूला विरोध होत असताना शिवाजी पेठेत मात्र जनात कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. शिवाजी पेठेची शिखर संस्था असलेल्या शिवाजी तरुण मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीत पेठेत 11 ते 21 सप्टेंबर दरम्यान जनाता कर्फ्यू जाहीर केला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यावर एकमत झाले आहे.
सक्ती केल्यास आम्हाला बोलवा : आप
शहरात ऐच्छिक जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. मात्र या कर्फ्यूमध्ये जिल्हा, महापालिका आणि पोलीस प्रशासनाची कोणतीही भुमिका असणार नाही, असे महापौर निलोफर आजरेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्फ्यू काळात जर कोणी दुकान बंद करण्याची सक्ती करत असल्यास आम्हाला बोलवा, असे आवाहन आम आदमी पार्टीने केले आहे.
रिक्षाही धावणार
शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी यापुर्वीच कर्फ्यूला विरोध केला आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर प्रवाशांमधून मिळत असणार अल्प प्रतिसाद यामुळे रिक्षा व्यवसायिक आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत आणखी दहा दिवस रिक्षा व्यवसाय बंद ठेवून पुन्हा संकट ओढावून घ्यावे, लागणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांनी जनता कर्फ्यूला विरोध करत रिक्षा धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.