बालिंगा येथील सराफाचा कारनामा, कुटूंबासह सराफ गायब
गुंतवणूकदार हवालदिल, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / कोल्हापूर
सुवर्ण ठेव योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास 18 टक्क्यापेक्षा जास्त परतावा देण्याच्या अमिषाने सराफाने गुंतवणूकदारांची 2 कोटी 9 लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूकीनंतर सराफाने कुटूंबासह पोबारा केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सोनार सतिश उर्फ संदीप सखाराम पोवाळकर (वय 34 रा. कणेरकरनगर, कोल्हापूर, मुळ रा. दोनवडे ता. करवीर), अमोल पोवार (वय 27 रा. सातार्डे ता. पन्हाळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद राजेंद्र विष्णु चिवटे (वय 60 रा. दोनवडे ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. बालिंगा, नागदेवाडी, लक्षतिर्थ वसाहत येथील सुमारे 50 हून अधिक लोकांकडून रक्कम तर काही लोकांकडून 1 किलोपेक्षा जास्त सोने गहाणवट ठेवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतिश पोवाळकर याचे 2010 पासून बालिंगा येथील आक्काताई चौगुले यांच्या इमारतीमधील गाळ्यामध्ये अंबिका ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. या ठिकाणी सतिश व त्याचा मेव्हणा अमोल पोवर हे दोघे दुकानाचा व्यवहार सांभाळत होते. दुकानामध्ये सुवर्ण ठेव योजनेतून गुंतवणूकदारांना 18 टक्के परतावा देण्याची योजना आहे. रोख रक्कमेसह सोनेही या ठिकाणी गहाणवट ठेवण्यात येत होते. दसरा, दिवाळी किंवा वर्षपूर्ण झाल्यानंतर गुंतवलेली रक्कम परताव्यासह गुंतवणूकदारास परत दिली जात असे.
दोनवडे, फुलेवाडी, कळंबा, बालिंगा, नागदेवाडी, लक्षतीर्थ वसाहत येथील गुंतवणूकदारांनी सतिश पोवाळकर याच्याकडे 1500 रुपयांपासून 32 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली. गेले काही वर्षे या रक्कमेचा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला. मात्र गेल्या काही वर्षापासून परतावा मिळणे बंद झाले. यातच बुधवार (7 एप्रिल) पासून दुकान बंद होते. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली. गुंतवणूकदारांनी सतिश उर्फ संदीप पोवाळकर याचा त्याच्या राहत्या घरासह दोनवडे गावी शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. गुंतवणूकदारांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होवू शकला नाही. यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी अखेर सतिश विरोधात करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली. व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
शेतकरी, भाजी विक्रेत्यांचे पैसे
जादा परताव्याच्या अमिषाने दोनवडे, फुलेवाडी, कळंबा, बालिंगा, नागदेवाडी, लक्षतीर्थ वसाहत येथील भाजी, दुध विक्रेत, विट भट्टी चालक, शेतकरी यांनी अंबिका ज्वेलर्समध्ये पैसे गुंतवले. मात्र सर्वच पैसे गेल्याने कष्टकरी व सर्वसामान्य गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. एक एक रुपया साठवून आयुष्यभराची जमा केलेली पुंजी गेल्याने अनेकांना अश्रु अनावर झाले.
पासबुक सिस्टीम
अंबिका ज्वेलर्सच्यावतीने गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला पैसे भरल्याचा पुरावा म्हणून पासबुक दिले जात होते. पैसे भरल्यानंतर या पासबुकमध्ये प्रत्येक महिन्याची इंट्री केली जात होती. तसेच त्यावर मिळणारी एकूण रक्कमही नमूद करण्यात आली होती.
फसवणूकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता
अंबिका ज्वेलर्सकडून झालेल्या फसवणूकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. सद्या 40 पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार तर 10 सोने गुंतवलेले गुंतवणूकदारांनी तक्रार दिली आहे. यामध्ये अजूनही गुंतवणूकदार येत असून फसवणूकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिली.