प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरासह जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे परिस्थितीही गंभीर बनत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता जिल्हय़ात तातडीने लॉकडाऊन जाहीर करावा किंवा जनता कर्फ्यु लागू करावा, अशी मागणी भाजपचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. निवेदनात महाडिक म्हणतात, महापालिका आणि जिल्हा प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही कोरोना संसर्ग वाढत आहे. हे एक प्रकारे राज्य सरकारचे अपयश आहे. अशा स्थितीत नागरिकांच्या जीवाशी न खेळता जिल्हय़ात किमान दहा दिवसांसाठी लॉकडाऊन अथवा जनता कर्फ्यु तातडीने जाहीर करावा. या काळात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनाच्या टेस्टची संख्या वाढविण्यात यावी, असेही महाडिक यांनी म्हटले आहे.