दिल्लीतील आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात गौरव, राज्यातील एकमेव ग्रामीण केंद्र म्हणून कोल्हापूरचा गौरव
प्रतिनिधी / कोल्हापूर
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्तीचे धोरण निश्चित केले आहे. त्यांतर्गत जिल्हा पातळीवरुन क्षयरोगमुक्तीत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल केंद्रीय आयुष मंत्रालयाने कोल्हापूर जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्राला रौप्यपदकाने गौरवले आहे. दिल्लीत बुधवारी रात्री हा पदक प्रदान सोहळा झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांना रौप्यपदक प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्रातून देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य, कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या उपक्रमातंर्गत सबनॅशनल सर्टीफिकेशन पुरस्कारासाठी केंद्रीय क्षयरोग विभागांने राज्यातील क्षयरोग केंद्रांची पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदशक सूचना, निकषाची प्रभावी अंमलबजावणी कोल्हापूर ग्रामीण क्षयरोग केंद्राने केली होती. त्यामुळे ब्रॉंझ सबनॅशनल सर्टीफिकेशनकरिता नामांकन झाले. केंद्रिय क्षयरोग विभाग व राज्यस्तरीय विभाग आणि विविध शासकीय 5 संस्थाद्वारे निवडलेल्या गावांचे सर्वेक्षण केले. तसेच गेल्या 5 वर्षांतील रुग्णांची पडताळणी, खासगी आणि शासकिय टी.बी. विरोधी औषधे वितरण पडताळणी केली. त्यातून रूग्णसंख्येत 40 टक्के घट झाल्याचे दिसून आले. या उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर ग्रामीण क्षयरोग केंद्राची रौप्यपदकासाठी निवड झाली होती.
रौप्य पदकासाठी देशातील 72 जिल्हे नामांकित झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 जिल्हे होते. केंद्रीय पथकाद्वारे सर्व्हेसाठी टीमनी पडताळणी केली. या टीमनी ठमकेवाडी, लखमापूर, गवशी, व्हन्नूर, हालोली, कुंभहल, कुर्तनवाडी, सातवे, वडगाव कसबा, कोरोची (सीटी), इचलकरंजी, टाकवडे, जयसिंगपूर, विकासवाडी, आरळे या 20 गावांत सर्वेक्षण केल्यानंतर रौप्यपदकासाठी शिफारस केल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी दिली.
नवी दिल्लीत बुधवारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी मान्यवरांच्या हस्ते रौप्यपदक स्वीकारले. या यशासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्व टी.बी सुपरवायझर, एल.टी.तसेच तालुकास्तरीय व आरोग्य वार्धिनी ग्रामीण रुग्णालय स्तरावरील अधिकारी, आरोग्य कर्मचाऱयांचेही सहकार्य लाभले.
देशातील कोल्हापूर हे सर्वोंत्कृष्ट ग्रामीण क्षयरोग निर्मुलन केंद्र
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने क्षयमुक्त भारतसाठी राबवलेल्या उपक्रमात देशात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या केंद्रांमध्ये हिमाचल प्रदेशातील लाहूल स्पिती, महाराष्ट्रातील ग्रामीणमधील कोल्हापूर, शहरांतर्गत परेल मुंबई आणि त्रिपुरातील पश्चिम त्रिपुरा जिल्ह्याचा समावेश आहे. या चारही केंद्रांना केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, चोबे यांच्या हस्ते रौप्यपदकाने गौरवण्यात आले आहे.