वार्ताहर / खोची
जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बँका,सरकारी कार्यालये बंद आहेत. यात शेती सेवा केंद्रे बंद आहेत. परिणामी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू आहेत. काही शेतकरी रोहिणी नक्षत्राचा पेरा साधत भात,सोयाबीन, भुईमूग पेरणी करतात;परंतु बियाणे उपलब्ध नसल्याने रोहिणीचा पेरा चुकणार आहे.मग पेरणी कधी करायची ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
वळीव पावसाबरोबर वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीची कामे जलद गतीने सुरू आहेत. यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.त्यामुळे शेतकरी शेतीची पेरणीपुर्व कामे करण्यात मग्न आहेत. काही शेतकऱ्यांची ऊस खोडवा,नेडवा भरणीची कामे सुरू आहेत; परंतु शेती सेवा दुकाने बंद असल्याने खत मिळेनासे झाले आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे करणे गरजेचे आहे. परंतु खताअभावी ऊस भरणीची कामे खोळंबली आहेत. तेवीस तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे.
परंतु सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.तसेच काही शेतकरी जूनच्या सुरवातीला आडसाली ऊसाची लागण करतात लागणीवेळी खतांचा डोस दिला जातो ; परंतु खत उपलब्ध होणार नसल्याने लागण करावी की नाही ह्या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये शेती सेवा दुकाने ठराविक वेळ सुरू होती त्याप्रमाणे याही वेळी शेती दुकाने सुरू ठेवावीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेती औषधे दुकाने चालू ठेवावीत. याबाबत भाजपा किसान मोर्चाचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष रमेश मगदूम यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून शेतीसाठी लागणारी सर्व औषधे व बियाणे मिळण्याची सोय करावी. अन्यथा कृषी सेवा केंद्र चालू ठेवावेत,अशी मागणी केली आहे.