आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. प्रकाश आवाडे यांची मागणी
आयजीएम रुग्णालयासंदर्भातील मागण्या लवकरच मार्गी लावण्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाह
प्रतिनिधी / इचलकरंजी
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून जिल्ह्यात नियमांचे पालन करुन अत्यावश्यक सेवांसह अन्य आस्थापना सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. या मागणीला आरोग्यमंत्री टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.
दरम्यान, इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील आवश्यक रिक्त पदे तातडीने भरण्यासह 42 कर्मचार्यांनाही रुग्णालय सेवेत सामावून घेण्यात यावे, रुग्णालयात वाढत्या रुग्णांची संख्या पाहता येथील बेड क्षमता 300 करण्यात यावी, रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्ती व आवर्ती खर्चासाठीचा 55 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशा आदी मागण्यांचे निवेदन आमदार आवाडे यांनी आरोग्यमंत्र्यांना दिले. त्यावेळी या सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही नामदार टोपे यांनी आमदार आवाडे यांना दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नगरपालिकेचे आरोग्य सभापती संजय केंगार आदी उपस्थित होते.