कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यात सोमवारपासून आणखी काही दिवस कडक लॉकडाउन करायचे की शिथिल करायचे याबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सायंकाळी तब्बल चार तास बैठक झाली. यामध्ये सोमवारपासून लॉकडाउन काही अंशी शिथिल करण्याचा निर्णय झाला. त्याबाबतची नियमावली रविवारी दुपारी जाहीर केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हापरिषदेचे सीईओ अमन मित्तल, मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून शिस्तबद्ध पद्धतीने लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याबद्दल प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे आभार मानतो.रविवारी लॉकडाऊनची मुदत संपत आहे .त्यामुळे सोमवारपासून आणखी काही दिवस कडक लॉक डाउन करायचे की त्यामध्ये शिथिलता आणायची याबाबत दीर्घकाळ बैठक झाली. यामध्ये सोमवारपासून लॉक डाउनमध्ये काही अंशी शिथिलता आणण्याचा निर्णय झाला आहे.त्यानंतर काय सुरू राहणार आणि किती वाजेपर्यंत सुरू राहणार याबाबतची नियमावली रविवारी दुपारी जाहीर केली जाणार आहे. पण शिथिलतेनंतर लोकांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आणि नियमांचे सक्तपणे पालन करण्याची गरज आहे .यापूर्वी अंत्यविधी, वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जरी शिथिलता आणली तरी नागरिकांनी महत्वाच्या कामानिमित्तच बाहेर पडावे . अजूनही कोरणा विरोधातील लढाई सुरूच असून यातून आपला बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करून सामाजिक अंतर राखण्याची गरज आहे. तरच आपला आणि आपल्या कुटुंबाचा कोरोना पासून बचाव होऊ शकतो.आणखी काही दिवस कडक लॉक डाउन केल्यास हातावरील पोट असलेल्या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय झाला आहे. पण काहीही करण्याचे लोकांना स्वातंत्र्य नाही, हे देखील लक्षात ठेवावे, असा इशाराही पालकमंत्री पाटील यांनी दिला.