पावसामुळे पेरण्यांना वेग, धुळवाफ पेरणीतील पिकांची उगवण, गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक 85.74 टक्के पेरणी पूर्ण, हातकणंले तालुका पिछाडीवर, केवळ 8 टक्के पेरणी,भात रोप लावणीला येणार वेग
.
कोल्हापूर / कृष्णात चौगले
मे महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या पूर्व मोसमी पावसामुळे जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱयांनी घाईगडबडीने पूर्वमशागत करून सुमारे 8 टक्के धुळवाफ पेरणी केली. त्याची उगवणदेखील चांगली झाली आहे. त्यानंतर मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेल्या मोसमी पावसामुळे उर्वरित खरीप पेरण्यांना वेग आला असून आजअखेर 44 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक 85.74 टक्के तर शिरोळमध्ये सर्वात कमी 8 टक्के पेरणी झाली आहे. जूनअखेरपर्यंत सुमारे 75 ते 80 टक्के पेरणी पूर्ण होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तरार्धापासूनच पेरणीला सुरुवात झाली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे या पिकांची चांगली उगवण झाली आहे. खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 2 लाख 4 हजार 75 हेक्टर आहे. यामध्ये भात, ज्वारी, नागली, मका, तूर, मूग, उडीद, तीळ, सोयाबिन, भुईमुग, इतर कडधान्ये व भाजीपाल्यांचा समावेश होतो. तर सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. सध्या 1 हजार 259 हेक्टर क्षेत्रामध्ये आडसाली ऊस लावण करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशके योग्य दरामध्ये उपलब्ध होण्यासाठी उत्पादक, वितरक व विक्रेते यांच्या उत्पादन व विक्री स्थळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जात आहे. यामध्ये 7 कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित केला आहे. विभागस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, विविध प्रकारची औषधे व खते खरेदी करण्यासाठी कृषि सेवा केंद्रामध्ये मोठी गर्दी होत आहे.
भात रोप लावणीला येणार वेग
जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात रोप लावण केली जाते. त्यासाठी मे अखेरीस भात तरवा टाकला असून लावणीयोग्य झाला आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात रोप लावणीला वेग येणार आहे. चिखलगुठ्ठा करून भात रोप लावण केली जात असल्यामुळे त्यासाठी दमदार पावसाची गरज असते. सध्या मध्यम ते जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे रोप लावणीसाठी पोषक स्थिती आहे.
खरीप हंगामासाठी रासायनिक खत मागणी
खरीप हंगामासाठी जूनअखेरपर्यंत 82 हजार 123 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली असून त्यापैकी 66 हजार 521 मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित 15 हजार 602 मेट्रिक टन खताचा पुरवठा 30 जूनपर्यंत होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.
तालुकानिहाय खरीप पेरणीची आकडेवारी
तालुका ससा.क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
हातकणंगले 22580 1823 8.07
शिरोळ 3184 1777 55.82
पन्हाळा 15915 7962 50.03
शाहुवाडी 15930 2722 17.09
राधानगरी 16835 3726 22.13
गगनबावडा 3777 774 22.92
करवीर 17001 5884 34.61
कागल 16840 10295 61.13
गडहिंग्लज 29824 27570 85.74
भुदरगड 20955 9992 47.68
आजरा 17405 9390 53.95
चंदगड 24230 6820 28.15
एकूण 204075 89567 40