विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रिय योजना असलेली महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून प्रामाणिक आणि नियमित कर्ज भरलेले शेतकरी कर्जमाफीला मुकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्जमुक्तीची घोषणा होवून नविन वर्ष उजाडण्याची वेळ आली तरी अद्याप काहीच हालचाली झालेल्या नाहीत. कोरोनाचे निमित्त पुढे करुन ही योजना गुंडाळली जाते की काय अशी भीती वर्तवली जात आहे. तसे झाल्यास जिल्हय़ातील 2 लाख 18 हजार शेतकऱयांना 1464 कोटींवर पाणी सोडावे लागू शकते. यामध्ये जिल्हा बँकेकडील सर्वाधिक 1258 कोटींच्या कर्जमाफीसाठी 1 लाख 92 हजार शेतकरी पात्र आहेत.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली. 1 एप्रिल ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली दोन लाखांपर्यंत आहे. अशा शेतकऱयांच्या कर्जखात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती अशी योजना होती. या पूर्वीच्या महायुती सरकारनेही थकबाकीतदार शेतकऱयांनाच कर्जमाफी दिली. तर आताच्या सरकारनेही कर्जबुडव्यांनाच कर्जमुक्ती दिली अशी टीका होवू लागल्याने सरकारने योजनेची व्यप्ती वाढवली. 2 लाखाच्या वरच्या कर्जासाठी एकरकमी, नियमित कर्ज भरणाऱयाना 50 हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली. यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. कर्जमाफीच्या अपेक्षेने जिल्हय़ातील 90 टक्के शेतकऱयांनी मुदतीत कर्ज परतफेड केली मात्र दोन महिने झाले तरी शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. मात्र योजनेची व्यप्ती घोषणेपूर्तीच होती का असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरा रब्बी हंगाम आला तरी कर्जमाफीचा पत्ता नाही. कोरोनाचे निमित्त पुढे करुन कर्जमाफी कागदावरच ठेवली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱयाला रस्त्यावर येता येत नाही. त्यामुळे आता पुन्हा डोक्यावर कर्ज घेवूनच रब्बी हंगाम करावा लागणार आहे.
थकबाकीदार 44 हजार 396 शेतकऱयांना 264.48 कोटी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हय़ातील आतापर्यंत जिल्हय़ामध्ये एकूण 44 हजार 396 शेतकऱयांच्या कर्जखात्यावर 264.48 कोटी इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हयामधील एकूण 48 हजार 249 शेतकरी पात्र ठरले आहेत. सर्व बँकांनी अपलोड केलेल्या खात्यांची संख्या 51426 होती.
शासनाकडून निर्देश आल्यानंतरच कार्यवाही
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र नियमित कर्ज भरणाऱया शेतकऱयांबाबत अद्याप काहीच आदेश आलेले नाहीत, मात्र ऐनवेळी धावपळ होवू नये यासाठी माहिती तयार ठेवली आहे.- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक