प्रतिनिधी / कोल्हापूर
काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि घटकपक्षांच्या महाविकास आघाडीने अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. भाजपकडून सत्ता खेचून घेत आघाडीच्या बजरंग ज्ञानू पाटील यांची अध्यक्षपदी तर सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. बजरंग पाटील यांनी ४१ मते मिळवून भाजप आघाडीच्या अरुण इंगवले (२४ मते) यांचा, तर सतीश पाटील यांनी ४१ मते मिळवत भाजप आघाडीच्याच राहुल आवाडे (२४ मते) यांचा पराभव केला. भाजपचे विजय भोजे यांना अपात्र ठरविल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही तर राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे एकूण ६५ सदस्यांनी मतदान केले.
या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहेत. तोच पॅटर्न आज (गुरुवार) जिल्हा परिषदेतही यशस्वी ठरला. यासाठी तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अथक प्रयत्न करून भाजपला एकाकी पाडले. आज दुपारी महाविकास आघाडीचे सर्व सदस्य बेळगावहून थेट जिल्हा परिषदेत पोहोचले. तसेच भाजप आघाडीच्या सदस्यांना कराडहून सकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोलीतील निवासस्थानी आणण्यात आले. तेथून ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात आले.
आज दुपारी ठीक दोन वा. पीठासन अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला सुरुवात झाली. त्यांनी अर्ज छाननीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी १० मिनिटांची मुदत दिली. या वेळेत उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने त्यांनी या पदासाठी मतदान प्रक्रिया होणार असल्याचे जाहीर केले. यानंतर अध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले.
अध्यक्षपदी बजरंग पाटील तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील यांचा १७ मतांनी विजय
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग पाटील यांना ४१ तर भाजप आघाडीचे अरुण इंगवले यांना २४ मते मिळाली. त्यामुळे बजरंग पाटील हे १७ मतांनी विजयी झाल्याची घोषणा नावडकर यांनी केली. यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी एकच जल्लोष केला.
यानंतर उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश पाटील यांना ४१ मते तर भाजप आघाडीचे उमेदवार राहुल आवाडे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे सतीश पाटील हे १७ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
अमरिश घाटगेंची महाविकास आघाडीलाच साथ
विशेष म्हणजे अमरीश घाटगे यांनी आपले सासरे अरुण इंगवले यांना मतदान न करता महाविकास आघाडीलाच साथ देणे पसंत केले. जिल्हा परिषदेत अखेर सत्तांतर झाले असून हा भाजपला मोठा धक्का आहे. विधानसभा निवडणुकीत सफाया झाल्यावर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय मानले जाणाऱ्या सत्ताकेंद्रातील सत्ता भाजपला गमवावी लागली आहे.