उचगाव/वार्ताहर :
महापुराच्या काळात जीव धोक्यात घालून खंडीत वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या उचगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा करवीर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गांधीनगर, मसुटेमळा, मनाडेमळा या भागातील वीज पुरवठा पुराच्या पाण्यामुळे खंडित झाला होता. त्या भागात पाणी आल्याने तिथून वीज पुरवठा करणे शक्य नव्हते. त्या भागास उचगावातून वीज पुरवठा चालू करणे गरजेचे होते. पण तावडे हॉटेल भागामध्ये पुराचे पाणी आल्याने उंचगावातील फिडर पाण्यात खाली गेला होता. त्या फिडर वरून गांधीनगरला वीज पुरवठा चालू करण्यासाठी उंचगावातील वीज वितरणचे कर्मचारी व अधिकारी यांनी आपला जीव धोक्यात घालून खंडित वीज पुरवठा चालू केला . ते करण्यासाठी त्यांनी पुराच्या पाण्यात जाऊन तावडे हॉटेल फिडर वरून वीज पुरवठा चालू करून गांधीनगर, मसुटेमळा, मनाडेमळा, तावडे हॉटेल परिसरात वीज पुरवठा चालू केला व कोरोना काळात अखंडित वीजपुरवठ्यासाठी जीवाची बाजी लावून काम केले. अशा वीज कर्मचारी व अधिकारी यांचा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या वतीने वीज वितरणचे शाखा अभियंता रघुनाथ लाड व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.#
यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, विक्रम चौगुले, सागर पाटील, संतोष चौगुले, दिपक रेडेकर, शिवानंद स्वामी, बाबुराव पाटील, अजित चव्हाण, सचिन नागटिळक आदी शिवसैनिक तसेच वीज वितरण शाखा अभियंता रघुनाथ लाड यांच्यासह वीज वितरणचे कर्मचारी प्रकाश फराकटे, किरण कोळी, महेश बेंद्रे, संदीप पाटील उपस्थित होते.