तब्बल दोन हजार टन कचरा कचऱ्यावरील प्रक्रिया थांबली कचऱ्याचा डोंगर आणि महापालिकेची डोकेदुखी वाढली लाईन बाजार परिसरात पुन्हा दुर्गंधीची भीती
कोल्हापूर / संजीव खाडे
कसबा बावडा लाईन बाजार येथील झूम प्रकल्पावर महापालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प सुरू केला होता. तो गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडला आहे. त्यामुळे कचऱ्यावर होणारी प्रक्रिया आणि वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी तब्बल दोनहजार टन कचरा प्रकल्पास्थळावर साचून राहिला आहे. प्रकल्पातून मिळणारी वीज मिळणे बंद झाल्याने महापालिकेवर महावितरणकडून अतिरिक्त वीज घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कोल्हापूर ग्रीन एजन्सी या प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीपुढे काही अडचणी आल्याने हा वीज निर्मिती थांबली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोल्हापूर शहरासह उपनगरातील दररोज तयार होणारा कचरा कसबा बावडा लाईन बाजार येथील झूम प्रकल्पावर (घनकचरा प्रकल्प) डंप केला जातो. या पूर्वी या ठिकाणी झूम कंपनीच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असे. झूम कंपनी गेल्यानंतर इतर कंपन्यांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू करण्यात आले. कचऱ्यापासून खत निर्मिती, कचऱ्यापासून वीज निर्मिती आदी प्रकल्प सुरू करण्यात आले. ओला, सुका कचरा वेगळा करण्याबरोबरच इनर्ट मटेरियलही वेगळे काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रिया केलेल्या कचऱ्यावर कॅपिंगही करण्याचे काम सुरू आहे.
असा आहे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प
कचऱ्यापासून वीज निर्मितीची प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाचा ठेका महापालिकेने कोल्हापूर ग्रीन एजन्सीला दिला आहे. ही एजन्सी राज्यातील एका आमदाराच्या संबंधित आहे. दररोज 180 ते 200 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाते. झूम प्रकल्पावरील विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेला दररोज 440 किलो वॅट वीज लागते. कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पातून महापालिकेला 240 किलो वॅट वीज मिळत होती. त्यामुळे उर्वरीत 200 किलो वॅट वीज महापालिकेला महावितरणकडून विकत घ्यावी लागत होती. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एका टनामागे महापालिका कोल्हापूर ग्रीन एजन्सीला 308 रूपये देते. पण आता प्रकल्प बंद पडल्याने वीज निर्मिती ठप्प झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर ग्रीन एजन्सीने काम बंद केल्यामुळे झूम प्रकल्पावरील इतर उपक्रम व प्रकल्पांवरही परिणाम झाला आहे.
झूमवरील कचऱ्याच्या डोंगरात 2000 टन कचरा
झूम प्रकल्पावर आधीच जुना कचऱ्याचे डोंगर आहेत. त्यातच आता गेली दोन महिने वीज निर्मिती प्रकल्प बंद पडल्याने दररोज होणारी 180 ते 200 टन कचऱ्यावरील प्रक्रिया बंद पडली आहे. हा सर्व कचरा प्रकल्पस्थळावर साचत आहे. दोन महिन्यात दोनहजार टन कचरा साचला असून दररोज त्यात वाढ होत आहे.
महापालिकेची डोकेदुखी वाढली
वीज निर्मिती प्रकल्प थांबल्याने महापालिकेपुढील डोकेदुखी वाढली आहे. दररोज निर्माण होणारा कचरा आणि त्यावरील थांबलेली प्रक्रिया यामुळे नजिकच्या काळात लाईन बाजार परिसरात पुन्हा झूमवरील कचऱ्याची दुर्गंधी आणि त्रास सुरू होण्याची भीती वाढली आहे. त्यावर महापालिकेला मार्ग काढावा लागणार आहे. सध्यातरी इतर कंपनीकडे जबाबदारी दिली नसल्याने प्रक्रिया न झालेला कचरा वाढत आहे.