निधी मंजूर मात्र अद्याप खरेदी नाही, कोंडाळामुक्तीसाठी 70 ते 80 टिप्परची आवश्यकता
नियोजनाच्या अभावामुळे कोंडाळामुक्तीची प्रतिक्षा
धीरज बरगे / कोल्हापूर
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान योजनेतून नुतन टिप्पर खरेदीसाठी महापालिकेला मंजुरी मिळाली आहे. मात्र महापालिकेला अद्याप खरेदीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. शहर कोंडळामुक्त करण्यासाठी आणखी 70 ते 80 टिप्परची आवश्यकता आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांलगत कोंडाळे दिसल्याने महापालिकेचा क्रमांक घसरला. याबाबतची कबुलीही स्थायी सभेत अधिकाऱयांनी दिली. तरीही निधी मंजुर असुनही अद्याप टिप्पर खरेदी न करण्यामागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियोजनच्या अभावामुळे केंडाळामुक्तीची प्रतिक्षा करावी लागत आहे.
शहरात दिवसाकाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 180 टनाहून अधिक कचरा संकलित केला जातो. घंटागाडी, केंटेनरद्वारे कचरा उठाव केला जायचां. मात्र या यंत्रणेद्वारे शहर कोंडाळामुक्त करणे अशक्य होते. त्यामुळे महापालिकेने शहर कोंडाळामुक्तीसाठी पाऊल उचलले. वर्षभरापुर्वी स्वच्छ भारत योजनेतून 104 टिप्पर खरेदी केल्या. टिप्परसह घंटागाडीच्या सहाय्याने कचरा उठावाचे काम सुरु आहे. आणखी 70 टिप्पर खरेदी करुन 2020 अखेर शहर कोंडाळामुक्तीचे नियोजन होते. मात्र वर्षसंपत आले तरी अद्याप निधी मंजूर असून टिप्पर खरेदी केलेल्या नाहित.
तर स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये महापालिका नवव्या क्रमांकावर
शहरात कोंडाळे निदर्शनास आल्याने महापालिकेला कोंडाळामुक्तीचे 700 गुण मिळाले नाहीत. यामुळे महापालिकेचा क्रमांक 16 वरुन 30Jej घसरला. स्वच्छ सर्व्हेक्षणबाबत माहिती असूनही प्रशासनाने कोडाळामुक्तीकडे दूर्लक्ष केले. कोंडाळामुक्तीचे नियोजन केले असते तर स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये कोल्हापूर महापालिकेला नऊ क्रमांक मिळाला असता.
पदाधिकारी, सदस्यांच्या संतापानंतर टिप्पर खरेदी होणार का?
यापुर्वी खरेदी केलेल्या 104 टिप्पर सुमारे तीन महिने शास्त्रीनगर बुद्धगार्डन येथील केएमटी वर्कशॉपमध्ये धुळ खात पडल्या होत्या. सर्वसाधारण सभेमध्ये पदाधिकारी, सदस्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरल्यानंतर टिप्परचा लोकार्पण सोहळा झाला. सध्या निधी मंजुर असूनही टिप्पर खरेदी केलेल्या नाहीत. त्यामुळे पदाधिकारी, सदस्यांनी पुन्हा अधिकाऱयांना धारेवर धरल्यानंतर टिप्पर खरेदी होणार का? असा प्रश्न होत आहे.
एकही प्रभाग कोंडाळामुक्त नाही
महापालिकेने शहरातील शंभर ठिकाणे कोंडाळामुक्त केली आहेत. आरोग्य विभागातील कर्मचाऱयांनी चोवीस तार पहारा देत शहरातील काही महत्वाच्या ठिकाणचे कोंडाळे हटवले. सध्या आठ ते दहा प्रभाग कोंडाळामुक्तीच्या मार्गावर आहेत. मात्र अद्याप एकही प्रभाग कोंडाळामुक्त करण्यात यश आलेले नाही.
कोंडाळामुक्तीसाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज
कोंडाळामुक्त केलेल्या ठिकाणी कचरा टाकू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशार देणारे फलक उभारले आहेत. तरीही काही नागरिकांच्याकडून याठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे कोंडाळामुक्त आणि स्वच्छ व सुंदर कोल्हापूरसाठी नागरिकांनी मानसिकतेते बदल करत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
महास्वच्छता अभियानाबरोबरच नियोजनाची गरज
आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 71 आठवडे अखंडपणे महास्वच्छता अभियान सुरु आहे. प्रत्येक रविवारी आरोग्य विभागातील कर्मचारी, सामाजिक संस्था, महापालिका पदाधिकारी, अधिकारी, सदस्य अभियानात सहभागी होत शहरातील विविध भागांची स्वच्छता करतात. यामुळे महास्वच्छता अभियानाप्रमाणेच शहर कोंडाळामुक्त करण्यासाठी नियोजन आवश्यक आहे.