कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी राज्यभर ही परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर जिल्हात या परीक्षेला 17604 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. प्रवेशपत्रानुसार सव्वादहापर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले, परंतू 10 वाजताच गेट बंद केल्याने शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. एस. टी. चा संप, प्रवेश पत्रावरील चुकीचे पत्ते या कारणावरून विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. शिक्षणाधिकारी, राज्यकर्ते यांना फोन करूनही कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण अशा संतप्त भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहेत
तब्बल तीन वर्षानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने महाटीईटी परीक्षा घेतली. त्यामुळे परीक्षार्थींना दिलासा मिळाला होता. रात्रंदिवस अभ्यास करूनही रविवारी शहरातील 33 परीक्षा केंद्रावर वेळेच्या कारणावरून प्रवेश दिला नाही. त्यामुळे अधिकारी आणि परीक्षार्थींमध्ये शाब्दीक चकमक झाली. टीईटी परीक्षेवरून सर्वच केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलीसांनी मध्यस्थी करून विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेर घालवले. प्रवेशिकेवरील वेळेनुसार परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचूनही काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नसल्याच्या तक्रारी शेकडो विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी विनवणी करूनही अधिकाऱयांनी त्याची दखल घेतली नाही. एस. टी.च्या संपामुळे परगावाहून येणाऱया काही विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही. काहींनी खासगी वाहनाला ज्यादाचे पैसे देवून परीक्षेला येणे पसंद केले. सर्वसामान्यांचा आधार असलेली एस. टी. बंद असेल तर प्रवाशांचे काय हाल होतात हे टीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांच्या रूपाने दिसून आले आहे. ऐरवी कार्यकर्त्यांना काही गरज लागली तर आवर्जुन सांगा म्हणणारे लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांना न्याय देवू शकले नाहीत. शासकीय अधिकाऱयांनी लोकप्रतिनिधींचा फोनच उचलला नसल्याचेही बोलले जात आहे.
परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत आले नाहीत, ती त्यांची चूक आहे. नोकरीसंदर्भात असलेल्या परीक्षेला नियमानुसार उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात घेता येणार नाही. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले. कोल्हापुरात अनेक गर्ल्स हायस्कूल असूही टीईटी प्रवेश पत्रावर फक्त गर्ल्स हायस्कूल असे लिहले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमके कोणते गर्ल्स हायस्कूल ओळखायचे. त्यामुळे शहरातील जवळपास तीन ते चार केंद्रावर फिरावे लागले. ओरीजनल आधारकार्ड असताना आधारकार्डची झेरॉक्स मागितल्याने पुन्हा झेरॉक्स केंद्रावर जावे लागले. शासनाच्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण ते शासनाने स्पष्ट करावे. असे विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे