कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, देशभर गाजलेल्या टोल विरोधी आंदोलनाचे निमंत्रक, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास श्रीपतराव साळुंखे वय 71 , राहणार मिरजकर तिकटी परिसर यांचे मंगळवारी मध्यरात्री आकस्मिक निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा कुलदीप, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे . बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील जी व्यक्ती उपस्थित होत्या. रक्षा विसर्जन बुधवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आहे.
तात्या म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या श्रीनिवास साळोखे यांनी पदवी बरोबर कायद्याचीही शिक्षण घेतले होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. एखादा प्रश्न घेऊन त्याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर चळवळ, आंदोलन अथवा लढा उभारण्याची त्यांची एक वेगळी पद्धत होती. त्यातूनच त्यांनी अनेक आंदोलने केली चळवळी आणि लढे उभारले. त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा झाला तो टोल विरोधी आंदोलनाचा लढा. आयआरबी कंपनीच्या विरोधात कोल्हापूरकरांचे मोठे आंदोलन उभे करण्याचे आणि ते शेवटपर्यंत तडीस नेण्याचे श्रेय श्रीनिवास साळोखे यांना जाते.