स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांची माहिती
वार्ताहर / उदगाव
तब्बल अठरा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद पुन्हा एकदा उदगाव ता. शिरोळ येथे होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाच्या आवाहनानुसार ही ऊस परिषद दिनांक २ नोव्हेंबर रोजी उदगाव येथील कल्पवृक्ष गार्डन या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी दिली. संघटनेच्या इतिहासात प्रथमच ऊस परिषद ऑनलाईन होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राजकीय चळवळीची कारकीर्द येथूनच सुरू झाली. उदगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये राजू शेट्टी हे सदस्य झाल्यानंतर त्यांचे गुरू दिवंगत शरद जोशी यांच्या उपस्थितीमध्ये उदगावमध्ये जंगी मिरवणूक काढून पहिली ऊस परिषद घेण्यात आली होती. यानंतर येथून पुढे १८ वर्षे ही परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर दरवर्षी घेण्यात येतो. मात्र, सध्या कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनानुसार परिषद ऑनलाईन घेण्याचे सर्वानुमते ठरले आहे त्याप्रमाणे दिनांक २ नोव्हेंबर रोजी उदगाव येथील गार्डनमध्ये १९ वी ऊस परिषद होणार आहे. १८ वर्षानंतर पुन्हा आपल्या कर्मभूमीत ही ऊस परिषद घेणार असल्याने औस्तुक निर्माण झाले आहे. त्याप्रसंगी स्वाभिमानी संघटना शेतकरी संघटनेचे नेते माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.