उचगाव / वार्ताहर
गेले पाच दिवस पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे बंद असलेला गांधीनगर, तनवानी कॉर्नर ते तावडे हॉटेल कोल्हापूर हा रस्ता दुपारी वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला. पुणे बेंगलोर महामार्ग चालू झाल्यानंतर तनवाणी कॉर्नर तावडे हॉटेल येथील महामार्ग उड्डाण पुलाखालील रस्त्यावर पाणी असल्याने ही वाहतूक उचगावमार्गे वळविण्यात आली होती. मात्र मंगळवारी उचगाव येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती.
तावडे हॉटेल महामार्ग उड्डाणपुलाखालील पाणी कमी झाल्याने गांधीनगर पोलिसांनी दुपारी तावडे हॉटेलमार्गे वाहतूक सुरु केली. वाहतूक सुरळीत चालू असल्याचे गांधीनगर पोलिसांनी सांगितले. गेले पाच दिवस हा रस्ता वाहतूकीसाठी बंद होता. आत्ता वाहतूक सुरळीत चालू झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निःस्वास सोडला.