करवीर शिवसेनेचे आगळे आंदोलन
वार्ताहर / उचगांव
कोल्हापुरात तावडे हॉटेल प्रवेशद्वार मुख्य रस्त्यावर करवीर शिवसेनेने वाहनधारकांना खड्ड्यांचे व भेगांचे सावधानतेचे फलक दाखवत आगळे आंदोलन केले. या या रस्त्याची दुरुस्ती करावी, असा कोल्हापूर महापालिकेस या आंदोलनाने इशारा दिला.
कोल्हापूरचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल मार्गावर रस्त्यामध्ये मोठमोठ्या भेगा व खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. येथे अनेक वेळा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. याबाबत महानगरपालिकेचे कायमचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुरवस्था कायम राहिली. वाहनधारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत राहिल्या. याकरिता करवीर शिवसेनेने तावडे हॉटेल स्वागत कमानीजवळ कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना सावधानतेचा इशारा देत जागोजागी खड्डे पडल्याचे फलक दाखविले. शिवसैनिक हातात फलक घेऊन पडलेल्या खड्ड्यांची व भेगांची माहिती देऊन वाहनधारकांना सावध करीत होते.
कोल्हापुरात येण्यासाठी शिये-बावडा मार्ग पाणी आल्याने बंद असल्याने तावडे हॉटेल रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी वाहनचालकांना सावधान करत शिवसैनिकांनी आगळे आंदोलन केले व या रस्त्यावरील भेगा व खड्डे बुजवण्याचा महानगरपालिकेस जणू इशाराच दिला.
करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. वाहतूकसेना जिल्हाप्रमुख दिनेश परमार, कामगारसेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, सरदार तिप्पे, प्रफुल्ल घोरपडे, वीरेंद्र भोपळे, बाळासाहेब नलवडे, बाबुराव पाटील, आदेश यादव आदी प्रमुख शिवसैनिकांनी आंदोलनात भाग घेतला.