डॉ. भारती साळे यांची माहिती
लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज, पालकांच्या लसीकरणास हवे प्राधान्य
प्रतिनिधी / कोल्हापूर :
शासनाने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहिम गतीमान केली आहे. यामध्ये ज्येष्ठ आणि मध्यम वयोगटातील बहुतांशी नागरीकांनी लस घेतली आहे. परिणामी तिसऱ्या लाटेत 18 वर्षांच्या आतील बालकांना कोरोनाचा धोका अधिक असून त्यांना लसीकरणाची गरज आहे. या वयोगटासाठी लस देण्याबाबत शासनाने नियोजन केले असले तरी अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वीच 18 वर्षांच्या आतील जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करून दक्षता घेण्याची गरज असल्याची माहिती डॉ. भारती योगेश साळे यांनी `तरुण भारत’शी बोलताना दिली.
डॉ. साळे म्हणाल्या, शासनाने लसीकरण मोहिम सुरु केल्यापासून 40 टक्क्यांहून अधिक नागरीकांनी पहिला तर 9 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये एक डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात `ऍन्टीबॉडीज’ तयार होऊन ते संरक्षित झाले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गापासून संबंधितांचा बचाव होऊ शकतो. आणि त्यांना कोरोना झालाच तर धोक्याची तिव्रता कमी असते. त्यामुळे लसीकरण झालेले नागरीक सध्या `सेफ झोन’मध्ये आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लसीकरण झाले नसलेल्या 18 वर्षाखालील बालकांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना लस देण्यासाठी प्रशासनाने सर्व आराखडा तयार केला असला तरी त्या तुलनेत लसींचा पुरवठा होणे अपेक्षीत आहे.
पालकांचे लसीकरण आवश्यक
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या अंदाजानुसार कोल्हापूर जिह्यात ऑगस्टअखेर किंवा सप्टेबर महिन्याच्या सुरुवातीस कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यामध्ये लहान मुलांना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. यावेळी कोरोना पॉझिटीव्ह मुलांना कोविड केंद्रात दाखल केल्यानंतर तेथे ते एकटे राहू शकणार नाहीत. त्यांच्यासोबत एखाद्या पालकांना कोविड केंद्रात थांबणे आवश्यक आहे. अशा वेळी ज्या पालकांचे लसीकरण झाले असेल, त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी राहिल. पण ज्या पालकांचे लसीकरण झालेले नाही, त्यांना मात्र कोविड केंद्रातून संसर्गाचा धोका अधिक आहे. आणि त्यांच्यापासून पुन्हा संसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱया लाटेपूर्वी जास्तीत जास्त पालकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचेही डॉ. भारती साळे यांनी स्पष्ट केले.