नैसर्गिक आपत्तीमुळे कलापथकांची परवड, कलाकारांतून तीव्र नाराजी
यात्रा, जत्रा, उत्सव नसल्याने कलापथक मालकोसह कलाकारांवर उपासमारीसह कर्जबाजारी होण्याची वेळ
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
निवडणुका त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात 2019 ला महापुराने झटका दिला होता. त्यातून सावरतोय असे वाटले तेवढ्यात कोरोनाचा विळखा पडला. हा विळखा घट्ट होत असल्याने यात्रा, जत्रांवर प्रतिबंध घालण्यात आला. त्यामुळे कलापथकांना गावागावातून कार्यक्रमासाठी मिळणारी सुपारीच गेल्या तीन वर्षापासून फुटली नाही. त्यामुळे कला क्षेत्रातील प्रत्येक घटकाचे आर्थिक चक्र थांबले आहे. यंदाही यात्रा, जत्रांच्या तोंडावरच सरकारने निर्बंध घातल्याने प्रेक्षकांना हसवणाऱ्या कलाकारांच्या चेहऱ्यांवरचा रंगच उडाला आहे. कलाकारांसह, कलापथकाचे मालक कर्जबाजारी झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर कला लोप पावतील, अशी भीती कलांकारातून व्यक्त होत आहे.
राज्यात हजारो तर कोल्हापूरातील कलापथकांची संख्या सर्व साधारण ऑर्केस्ट्रा 28 यासह छोटीमोठी कलापथके मिळून 40 आहेत. या कालापाथकावर जवळपास 3 हजार कलाकारांचा संसार अवलंबून आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून या कलाकारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. गतवर्षीचा हंगाम कोरोना काळात गेल्याने, कोरोनाचे नियम शिथील केल्यानंतर कलापथकांनी रंगीत तालमी सुरू केल्या होत्या. पण ऐनवेळेला कला क्षेत्रावर सरकारने निर्बंध आणले आहेत. नाटक, लावणी, कलापथक, ऑर्केस्ट्रा, एकपात्री प्रयोग, भारुड, जागरण गोंधळ, विविध प्रकारचे वाजंत्री, नाटÎवितरक, निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह पडद्यामागच्या कलाकारांना आर्थिक फटका बसला आहे. पडद्यामागच्या कलाकारांचे हातावरचे पोट असल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कलापथकांच्या मालकांनी गतवर्षी हंगामापुर्वी घेतलेल्या कर्जाचे व्याज फेडता फेडता ते आणखी गर्तेत सापडत आहेत.
नाटक, तमाशा, ऑर्केस्ट्रामधील कलाकार मुळातच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. जत्रा, यात्रांच्या हंगामात दररोज एका गावची सुपारी असल्याने कलाकार घरदार सोडून गावो-गावी फिरतात. पहाटेपर्यंत नाटक सादर करून झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघतात. मिळेल त्यात समाधान मानत प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्यांवर खुश होतात. कोरोनामुळे या कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. कलापथकांच्या मालकांकडेही कलाकारांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत कलेशी प्रमाणिक राहणारा कलाकार टाळ्या आणि शिट्यांची शाबासकी मिळाली की खुष होतो. कलेची नशा आठ दहा दिवस उतरत नाही. पण अन्नासाठी शासनाच्या आर्थिक आधाराची गरज आहे, अशा भावना कलाकारांकडून व्यक्त होत आहेत.
आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही गेल्या तीन वर्षापासून गणपती, नवरात्र, दिवाळी यासह गावातील यात्रा, जत्रांचा हंगाम झालाच नाही. गेल्या वर्षभरात तर घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नाही.जानेवारी महिन्यापासून सुरळीत होईल, असे वाटले परंतू आता पुन्हा कलापथकांना कला सादरीकरणास परवानगी नाकारली आहे. सांस्कृतिक मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आहेत. तरीही सरकार कलाकारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारने कला सादरीकरणास परवानगी दिली नाही, तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. मुकुंद सुतार (कलापथक निर्माता असोसिएशन अध्यक्ष) |
उपाशी मरण्यापेक्षा आजाराने मरु- संवेदनशिल मनाचे कलाकार गेल्या वर्षभरापासून कष्टाची काम करीतआहेत. काही पुरस्कारप्राप्त कलाकार उदरनिर्वाहासाठी गवंडी काम, भाजीपाला विकत आहेत. उपाशी मरण्यापेक्षा आजाराने मेलेले बरे अशीच कलाकारांची भावना झाली आहे. त्यामुळे कलाकार आणि त्याची कला जिवंत ठेवायची असेल तर सरकारने नियम घालून यात्रा-जत्रा सुरू कराव्यात. शादरा हिलगे (कलापथक निर्माता असोसिएशन अध्यक्ष) |