प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रभाग रचना बदलणार असल्याने इच्छुकांची घालमेल होणे सहाजिकच आहे. परंतु, कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. त्रिसदस्सीय प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर पडली आहे. आसपासच्या प्रभागातील इच्छुकांनी एकसंघ होवून कामाला लागावे. पदाधिकाऱयांनी मतदार नोंदणीसह इतर माध्यमातून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचवावे. शिवसेनेचा पहिला महापौर करण्यास सज्ज व्हा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात दिल्या.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुक आणि तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या धर्तीवर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात झाला. यावेळी मार्गदर्शन करताना राजेश क्षीरसागर यांनी मागच्या दोन्ही महानगरपालिका निवडणुकींचा आढावा घेतला. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे 20 ते 25 उमेदवार दुसऱया क्रमांकावर असल्याचे पहावयास मिळते. प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकत आहे. त्यामुळे बदलेल्या प्रभाग रचनेनुसार शिवसेनाही नवीन रणनिती आखणार आहे. कोणत्याही परिस्थिती यावेळी शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकविण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रियता, शिवसेनेची ताकत आणि उमेदवारांची एकसंघता या बळावर शिवसेना निवडणुकीस सामोरे जाणार आहे. शिवसेनेचा महापौर होईल यात तिळमात्र शंका नाही.
माजी उपमहापौर रविकिरण इंगवले म्हणाले, बदललेल्या प्रभाग रचनेनंतर शिवसेनेचे पारडे अधिक जड असून, राज्यात, शहरात शिवसेना असावी, असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनहिताच्या कामामुळे शिवसेनेची वोट बँक वाढली असून, त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना होणार आहे. यावेळी कोल्हापूर उत्तर विभागसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख रघुनाथ खडके, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, माजी परिवहन सभापती नियाज खान यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अंकुश निपाणीकर यांनी केले. यावेळी शहरप्रमुख जयवंत हारूगले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, यांच्यासह शिवसेनेचे उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, इच्छुक उमेदवार, युवा सेना व अंगीकृत संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.