शेतकऱयांकडून रेल राकोचा प्रयत्न
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती रेल्वे स्थानकावर आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून देण्यात आले.
शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या अशी मागणी करीत राजधानी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार फक्त चर्चा करत आहे. गेली दोन महिने शेतकरी रस्त्यावर आहेत. सरकार या विषयावर गंभीर नाही. असा आरोप कॉम्रेड नामदेव गावडे यांनी केला.
सकाळी 11 वाजात संघर्ष समितीचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर दाखल झाले. केंद्र सरकरचा निषेध करीत रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलकांना पोलिसांनी अटकाव केला. पोलिसांचे कडे तोडून आंदोलकांनी जाण्याचा प्रयत्न करत असताना झटापट झाली. दहा मिनिटे हा गोंधळ सुरु होता. अखेर आंदोलकांना ताब्यात घेत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. काही वेळानंतर सोडून दिले. आंदोलनात कॉम्रेड चंदकांत यादव, सतिशचंद्र कांबळे, नामदेवराव गावडे आदी सहभागी झाले होते.