प्रतिनिधी / कोल्हापूर
चार दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असून पुन्हा धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले आहे. 95 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. राधानगरी धरणाच्या चार दरवाजांसह वीज गृहातून 7112 क्युसेक जलविसर्ग सुरु आहे. दुधगंगेतून 12 हजार 950 तर पुरस्थितीस कारणीभूत ठरणाऱया अलमट्टी धरणातून तब्बल 2 लाख 50 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 8 राज्यमार्ग आणि 25 प्रमुख जिल्हा मार्ग तर जिल्हापरिषदेअंतर्गत येणारे 37 मार्ग बंद झाले असून वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे. प्रशासनाने प्रयाग चिखलीसह जिह्यातील चार गावांमधील 1709 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
पंचगंगेची वाटचाल धोकापातळीकडे सुरु असल्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी पुरस्थितीचा आढावा घेऊन संबंधित विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्यामुळे राधानगरीसह पंचगंगा खोऱयातील धरणातून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिह्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होत आहे.
सलग चार दिवस सुरु असलेल्या पावसामुळे 95 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेसह इतर उपनद्यांच्या पुराचे पाणी नदी काठावरील शिवारात पसरल्यामुळे खरीप पिकांसह ऊस पिक सलग दुसऱयांदा पूर्णपणे बुडाल्यामुळे या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये करवीर 67.55, कागल 61.71, पन्हाळा 69.43, शाहूवाडी 73, हातकणंगले 25.25, शिरोळ 20.71, राधानगरी 89, गगनबावडा 124.50, भूदरगड 94.40, गडहिंग्लज 60.43, आजरा 116.25, व चंदगड तालुक्यात 130.83 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली असून भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, ,शिरगाव, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे हे सहा बंधारे, तुळशी नदीवरील बीड व आरे हे दोन बंधारे, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी, कोंडोली, माणगाव, खोची व शिगाव, दानोळी व चावरे व मांगले-सावर्डे हे 9 बंधारे , कासारी नदीवरील करंजफेण, करंजफेण, पेडाखळे, बाजार भोगाव, वाळोली, पुनाळ-तिरपण, ठाणे-आळवे व यवलूज हे सात बंधारे पाण्याखाली गेले असून कुंभी नदीवरील कळे, शेणवडे, मांडूकली व वेतवडे हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कडवी नदीवरील पाटणे, सवते-सावर्डे, व शिरगाव हे तीन बंधारे, वेदगंगा नदीवरील बस्तवडे, वाघापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व चिखली हे सहा बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील गिजवणे, निलजी, साळगाव, खंडाळ व ऐनापूर हे पाच बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा नदीवरील पिळणी, बुजूर भोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डे व अडकूर हे पाच बंधारे, ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी आणि कुर्तनवाडी हे दोन बंधारे, दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सूळकुड, बाचणी व सिद्धनेर्ली हे चार बंधारे, कडवी नदीवरील पाटणे, सवते-सावर्डे, शिरगाव हे तीन बंधारे, धामणी नदीवरील सुळे, आंबर्डे ,म्हासुर्ली, गवशी, पणोरी व गवशी हे 6 बंधारे, वेदगंगा नदीवरील बस्तवडे, वेदगंगा,नंद्याळ, वादापूर, निळपण, कुरणी, सुरुपली व चिखली हे सहा बंधारे, जांबरे नदीवरील कोकरे, नावेली, उमगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेले असून एकूण 95 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
4 गावांमधील 1709 जणांचे स्थलांतर
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे व 365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील चिखली गावातील 895 व्यक्ती व 237 जनावरांचे स्थलांतर केले आहे. आंबेवाडी गावातील615 व्य़क्ती आणि 112 जनावरांचे स्थलांतर केले आहे. चंदगड तालुक्यातील 1 बाधित गावातील 45 कुटूंबांतील 184 व्यक्ती व 16 जनावरांचे स्थलांतर केले आहे. कोल्हापूर मनपा क्षेत्रातील 8 कुटूंबांतील 15 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थालंतर केले आहे.
धरणांतील जलविसर्ग
धरणे जलविसर्ग(क्युसेकमध्ये)
राधानगरी 7112
दुधगंगा 12950
वारणा 14486
तुळशी 884
कुंभी 650
कासारी 1250
कडवी 2519
पाटगाव 1072
घटप्रभा 2724
जंगमहट्टी 634
चित्री 2005
चिकोत्रा 00
कोदे ल.पा. 818
जांबरे 2265
अलमट्टी 250000