रंकाळ्याचे प्रदूषण टाळण्यासाठी एकशे त्रेचाळीस वर्षापूर्वी केलेला प्रयोग
सुधाकर काशीद / कोल्हापूर
नदीत तलावात कपडे धुवू नयेत जनावरांना सोडू नये हे खरेच आहे. मग ज्यांच्या घरी पाण्याची पुरेशी सोय नाही त्यांनी मग काय करावे? ज्यांच्याकडे सोय नाही ते सहाजिकच नदी तलावाच आधार घेणार आणि त्यामुळे नैसर्गिक जलसाठे नक्कीच प्रदूषित ही होणार… नेमकी ही परिस्थिती आज नव्हे, काल नव्हे तब्बल एकशे त्रेचाळीस वर्षांपूर्वी विचारात घेऊन कोल्हापुरात धुण्याची चावी बांधण्यात आली आणि ती जलसाठे प्रदूषित न करणाऱ्या एका प्रयोगाचे देशभरात एक आदर्श मॉडेल ठरली.
ही धुण्याची चावी जरूर देशभर एक आदर्श आहे .पण परिस्थिती अशी आहे की आत्ताच्या कोल्हापुरातील बहुसंख्य जणांना ही धुण्याची चावी कोठे आहे हे माहित नाही असे वास्तव आहे. वारसा स्थळ जतन सप्ताहाच्या निमित्ताने या धुण्याच्या चाविचा जुना इतिहास एका नव्या जाणिवेने पुन्हा पुढे आला आहे. बाहेरचे पर्यटक राहू देत पण निदान सर्व कोल्हापूरकरांनी ही धुण्याची चावी एकदा पाहण्याची गरज आहे. कारण पाणी प्रदूषणाबाबत आपले त्यावेळचे प्रशासन किती जागरूक होते याचे हे अस्सल उदाहरण आहे.
रंकाळा तलाव आणि कोल्हापूरचे एक वेगळे नाते आहे. किंबहुना रंकाळा हा कोल्हापूरच्या अस्तित्वाचा एक खळाळता घटक आहे. रंकाळा तलाव नैसर्गिक घडामोडी व पाणी साठवण्याचा केलेला प्रयत्न यातून उभा राहिला आहे. त्याला खूप प्राचीन इतिहास आहे. मात्र 1877 साली तलावाच्या बंधार्याची भिंत अधिक भक्कम व्हावी म्हणून तलावाच्या काठाचे दगडी बांधकाम करण्यात आले. व या तलावाला एक आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले. काठावर कठडे, लोकांना फिरण्यासाठी फुटपाथ आणि आठ उंच खांबावर
दगडी रंकाळा टॉवर उभा राहिला. मात्र, हे करताना रंकाळा तलावाचे हे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेण्यात आली. कारण त्याकाळात घरोघरी पाण्याचे नळ नव्हते. त्यामुळे या परिसरातील लोक कपडे धुण्यासाठी, आपली दुभती जनावरे धुण्यासाठी त्यांना रंकाळा तलावातील पाण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे तलावातील पाणी नक्कीच प्रदूषित होत होते. आणि लोकांना तलावात कपडे धुऊ नका असे सांगितले तर दुसरा पर्याय नसल्याने लोक पुन्हा पुन्हा तलावाकडे कपडे धुण्यासाठी येत होते. नेमकी ही परिस्थिती ओळखून 1877 साली रंकाळा तलावाची नव्याने बांधणी करताना लोकांच्या कपडे धुण्याच्या सोयीसाठी धुण्याची चावी हे स्वतंत्र बांधकाम रंकाळापासून अवघ्या दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर करण्यात आले.
या बांधणीनुसार रंकाळा तलावातील पाणी एका खास नळाने याठिकाणी आणण्यात आले. त्याला पुन्हा स्वतंत्र नळ जोडण्यात आले. लोकांना कपडे धुण्यासाठी दगडी कट्टे व पाणी साठवण्यासाठी दगडी कुंड बांधण्यात आले. आसपासच्या परिसरातील शंभर कुटुंबातील लोक या धुण्याच्या चावीवर आपल्या घरातील कपडे आरामात धुवु शकत होते. आपल्या घरातील दुभती जनावरांना पाणी पाजू शकत होते. किंबहुना अशीच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. त्यामुळे लोक या धुण्याच्या चावी वर कपडे धुण्यासाठी येऊ लागले आणि रंकाळा तलावात होणारे प्रदूषण कमी होऊ लागले.
आज आज जरूर घरोघरी पाण्याचे नळ आहेत. त्यामुळे रंकाळा तलाव आणि या धुन्याच्या चावीच्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी येणाया लोकांचे प्रमाण नक्कीच कमी झाले आहे. त्यावेळी तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून बांधण्यात आलेली ही धुण्याची चावी आजही ही भक्कमपणे उभी आहे. या ठिकाणचे दगडी कट्टे दगडी कुंड दगडी कुंपण व पाणी वाहून जाण्यासाठी असलेली यंत्रणा पाहून तत्कालीन प्रशासन कौतुकाचे धनी आहे.
या धुण्याच्या चावीतून बाहेर पडणारे पाणी पुढे शेतीला वापरण्यात आले व अतिरिक्त पाणी दुधाळी नाल्यात जाऊन मिसळू लागले. या धुण्याच्या चावीसाठी एक स्वतंत्र व्हॉल्व आहे. हा व्हॉल्व सोडला की सर्व चाव्यातून एकावेळी पाणी वाहू लागते व लोकांचे कपडे धुऊन हा वॉल्व बंद केला की पाणी बंद होते. अतिशय सुलभ आणि नैसर्गिक उताराचा आधार घेऊन केलेली ही धुण्याच्या चावीची योजना म्हणजे जलसाठ्याचे प्रदूषण टाळण्यासाठी केलेली एक आदर्श योजना आहे. दुर्दैव असे की की आजच्या पिढीला ही धुण्याची चावी आणि त्याच्या मागील संकल्पना याची थोडीही माहिती नाही. त्यामुळे या धुण्याच्या चावीचा इतिहास सर्वांना करून देण्याची गरज आहे.