कोल्हापूर / संजीव खाडे
नव्वदच्या दशकातील तो काळ. त्यावेळी मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हते, व्हॉटस्-अप, फेसबुक आणि यु-टय़ूबही नव्हते. झेरॉक्स मशिनच्या आगमनाचा तो काळ. कोणत्य़ाही कागदपत्राची झेरॉक्स प्रत काढण्याच्या आधी ते काम सायक्लोस्टाईलचे माशिन करत होते. ऑफलाईनच्या जमान्यात पोस्टाच्या टपाल सेवेला महत्व होते. कारण तेव्हा कुरिअरची एंट्री झाली नव्हती. अशा या काळात दहावी, बारावी पास झालेले, पदवी परीक्षा देत असताना एमपीएससी, युपीएससी अर्थात राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, बँकेच्या, रेल्वे आणि पोस्टाच्या परीक्षा देत नोकरीची स्वप्ने पाहणार्या युवकांसाठी गुगलगुरूसारखे सर्च इंजिन होते.
अंबाबाई मंदिर परिसरातील प्रसिद्ध वांगी बोळातील दिलीप गुळवणी नामक ते सर्च इंजिन तेंव्हा शहरातील नव्हे तर जिल्हय़ातील नोकरीच्या शोधातील हजारो बेकार, बेरोजगार युवक आणि युवतीचा आधार होते. मंगळवारी गुळवणी यांचे निधन झाले. तीन दशकांपूर्वीच्या पिढीतील नोकरीची स्वप्ने पाहणार्यांच्या आठवणीतील दिलीपराव गेले.
आजच्या ऑनलाईन जमान्यातील पिढीला दिलीपराव गुळवणी नावाची व्यक्ती कदाचित माहितही नसेल. पण एशी, नव्वदच्या दशकांपासून अगदी इंटरनेटने जग व्यापून टाकण्याआधी दिलीपरावरच कोल्हापूरच्या नोकरी शोधणाऱयांसाठी गुगल, इंटरनेट होते. ऑफलाईनच्या त्या जमान्यात वांगी बोळातील गुळवणी वाडय़ातील रस्त्यासमोरील कार्यालयवजा छोटय़ा खोलीत विद्यार्थ्यांची सतत गर्दी असायची. मराठी, इंग्रजी वृत्तपत्रात बँक, पोस्ट, रेल्वेच्या भरतीची जाहिरात आली की अर्ज भरण्यासाठी गुळवणी यांच्या दारात रांग लागायची. एमपीएससी, युपीएससी या परीक्षांची जाहिरात निघाली की, पुन्हा गुळवणींचा आधार.
दिलीपरावही भन्नाट माणूस. कोणत्याही भरतीची अथवा परीक्षेची जाहिरात निघाली की, त्याचे पेपरकटिंग आपल्या खोलीवजा कार्यालयात फलकावर, बोर्डावर लावून येणाऱया प्रत्येकाला मार्गदर्शन करणे हा त्यांचा स्वभाव. अर्ज भरून देण्याबरोबर तो पोस्टाव्दारे पाठविण्याचे कामही दिलीपराव करत. अर्जाचे पाच दहा रूपये आकारून सेवा देणारा गुळवणी नामक अवलिया अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार असेल आणि पोस्टाने अर्ज वेळेत पोहचणे शक्य नसेल तर स्वतः सर्व अर्ज घेऊन मुंबईतील राज्य लोकसेवा आयोगाचे कार्यालय गाठत असे. उशिर झालेल्यांचे अर्ज जमा करत असे. नोकरीचे स्वप्न पाहणाऱयाचे स्वप्न मोडू नये, यासाठी दिलीपरावांनी काम केले.
त्यांचा तो व्यवसाय होता. पण त्यात लुबाडणूक कधीही नव्हती. व्यवहाराने जेवढे आवश्यक आहे, तेवढेच पैसे आकारणारे दिलीपराव काळाच्या ओघात मागे पडले. ऑफलाईनच्या जमान्यात ऑनलाईन राहून वाटाडय़ाची भूमिका पार पाडणारे दिलीपराव ऑनलाईनच्या जमान्यात मात्र ऑफलाईन झाले. पिढी बदलत गेली. इंटरनेट आणि संवादाची इतर माध्यमे आली. त्यातून नोकरी असो वा मार्गदर्शन असो यांचे फॉर्म, संदर्भ बदलले. नव्या पिढीने नवा मार्ग स्वीकारला. दिलीपराव कालौघात विस्मरणात गेले. मात्र त्यांच्या मार्गदर्शनामुळे नोकरी मिळवून मोठ-मोठय़ा पदावर गेलेल्यांना मात्र वांगी बोळातील गुळवणींचे घर, नोकरीचा अर्ज स्वतः लिहून देणारे, त्यावर आपल्याजवळील खळीने, डिंकाने स्टॅप चिटकविणारे, तो अर्ज पाकिटात (इन्व्हलप) घालून त्यावर पोस्टाचे तिकीट लावून ते टपाल करणारे दिलीपराव आता वांगी बोळातून जाताना दिसणार नाही याची खंत कायम राहिल.