वार्ताहर / प्रयाग चिखली
नागपूर – रत्नागिरी (पर्यायाने कोल्हापूर- रत्नागिरी) महामार्गाचा पूर्वी (२०१६-१७) झालेले रेखांकन-सर्वे योग्य प्रकारे होते. मात्र २०२० नंतर या रेखांकनात बदल केल्यामुळे करवीर तालुक्यातील शिये फाटा ते केर्ले यादरम्यानच्या सात गावातील नैसर्गिक स्तोत्र व मालमत्तेचे संभाव्य नुकसान वाढणार असल्याने केर्ली येथे सात गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन या महामार्गाच्या कामाला तीव्र विरोध दर्शविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शेतकऱ्यांच्या विरोधामुळे महामार्गाचे भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊन महामार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर रत्नागिरी या महत्वकांक्षी रस्ता प्रकल्पासाठी बहुतांशी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात येत आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा मार्ग केर्ले गावापासून शिये गावाच्या दिशेने रस्ता वळवण्यात आलेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या मते हा रस्ता केर्ली- निगवे -कुशिरे -भुये व शिये गावातून काढण्याबाबत २०१६-१७ साली सर्वे- रेखांकन झाले होते. त्यावेळी हा रस्ता बहुतांश शेतकऱ्यांना मान्य होता मात्र या रेखांकनात अलीकडे बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे परिसरातील सात गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे नुकसान होणार आहे.
तसेच या बदललेल्या व्यवस्थेमुळे या मार्गामध्ये ३५ विहिरी २५ बोरवेल्स २ पाण्याच्या स्कीम तसेच अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. हे नुकसान आम्हाला पेलणार नाही अशी प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांची झाली असून या नवीन रेखांकनास विरोध करण्यासाठी आज केर्ली परिसरातील शेतकऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत जुने रेखांकन आणि नवीन रेखांकन याबाबत साधक-बाधक चर्चा झाली बैठकीमध्ये जुने रेखांकन हे नवीन रेखांकन पेक्षा शासन व शेतकरी या दोन्ही घटकांच्या फायद्याचे असल्यावर शेतकर्यात एकमत झाले या मार्गाला विरोधाचे धोरण अवलंबण्याचे निश्चित झाले.
त्या अनुषंगाने शासकीय पातळीवर ही बाब लक्षात आणून देण्यासाठी नवीन लेखांकन प्रक्रियेला तीव्र विरोध करण्याचा व प्रसंगी आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत झाला. यावेळी आंदोलकांच्या वतीने दत्त आसुर्ले कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन महादेव व्हरांबळे तसेच कुशिरे चे माजी सरपंच विष्णू पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी समिती स्थापन करून टप्प्याटप्प्याने विरोध तीव्र करण्याबाबत प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान शेतकऱ्यांची एकजूट म्हणून या वेळी रेखांकन बदलणाऱ्या धिकार्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी केर्ली येथील महादेव व्हरांबळे, गणपती कोपार्डे सर्जेराव शिंदे तानाजी पाटील कुशिरे चे माजी सरपंच- विष्णू पाटील, उपसरपंच- संजय कांबळे मधुकर कळके सचिन पाटील, केर्ले येथील नामदेव गोळे शिवाजी गायकवाड बाळासो भोसले पडवळवाडी येथील तुकाराम यादव बाळासाहेब आळवेकर, आदींसह करवीर तालुक्यातील केर्ली, केर्ले, पडवळवाडी,भुये, भुयेवाडी तर पन्हाळा तालुक्यातील कुशिरे या गावातील शंभरावर शेतकरी उपस्थित होते.